जाहिरात

Mumbai News: रखडलेले पूल अन् मुंबईकरांचे हाल! सायन, एल्फिन्स्टन आणि बेलासिस पुलांमुळे वाहतुकीचा खोळंबा

Mumbai News: मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील हा ऐतिहासिक पूल मोडकळीस आल्याने 2024 मध्ये पाडण्यात आला. यामुळे ताडदेव आणि नागपाडा परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे.

Mumbai News: रखडलेले पूल अन् मुंबईकरांचे हाल! सायन, एल्फिन्स्टन आणि बेलासिस पुलांमुळे वाहतुकीचा खोळंबा

'धावणारी मुंबई' अशी ओळख असलेल्या या शहराचा वेग सध्या पुलांच्या कामांमुळे पार मंदावला आहे. दक्षिण मुंबईला उपनगरांशी जोडणारे सायन, एल्फिन्स्टन आणि बेलासिस हे तीन महत्त्वाचे दुवे एकाच वेळी प्रभावित झाल्यामुळे मुंबईकर गेल्या दोन वर्षांपासून वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात अडकले आहेत.

मुंबईच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधांचे जाळे विणले जात असले, तरी जुन्या पुलांच्या पाडकामामुळे सध्या सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. शहराच्या पूर्व-पश्चिम वाहतुकीचे कणे मानले जाणारे तीन महत्त्वाचे पूल एकाच कालखंडात प्रभावित झाल्याने मुंबईचा वेग कमी झाला आहे. 

बेलासिस ब्रिज (मुंबई सेंट्रल)

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील हा ऐतिहासिक पूल मोडकळीस आल्याने 2024 मध्ये पाडण्यात आला. यामुळे ताडदेव आणि नागपाडा परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे, या पुलाचे काम आता पूर्ण झाले असल्याचे समजते, तरीही तो अद्याप वाहतुकीसाठी खुला न केल्याने स्थानिकांमध्ये संताप आहे. याचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिका आणि बेस्ट बसेसना बसत आहे.

(नक्की वाचा-  Holiday News: 7 फेब्रुवारीला राज्यात सुट्टी जाहीर, कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

सायन पूल: पूर्व द्रुतगती महामार्गावर प्रचंड भार

मध्य रेल्वेवरील सायन पूल पाडण्याचे काम सुरू झाल्यापासून धारावी, कुर्ला आणि एलबीएस मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. ठाणे आणि नवी मुंबईकडून येणाऱ्या वाहनांमुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर अभूतपूर्व कोंडी होत आहे. महापालिकेने हा पूल जुलै 2026 पर्यंत सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

एल्फिन्स्टन (प्रभादेवी) ब्रिज: मध्य-पश्चिम रेल्वेचा अडथळा

दादर आणि लोअर परेलला जोडणारा हा मुख्य दुवा नुकताच पाडण्यात आला आहे. यामुळे नोकरदारांचा प्रवासाचा वेळ दुप्पट झाला आहे. अरुंद पर्यायी रस्ते आणि पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी लागणारा अनिश्चित कालावधी यामुळे येथील परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

(नक्की वाचा-  Vasai-Virar Mahapalika: वसई-विरारवर 'बविआ'चाच झेंडा! भाजपचा पराभव; अजीव पाटील नवे महापौर)

वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे आणि परिणाम

सरासरी प्रवासाच्या वेळेत 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, पुलांचे काम 'फेज' वाईज (टप्प्याटप्प्याने) करणे आवश्यक होते. एकाच वेळी तीन मार्ग बंद केल्याने पर्यायी रस्ते अपुरे पडत आहेत. पुलांच्या कामासोबतच अनेक ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ते अधिक अरुंद झाले आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com