- नाशिकच्या बागलाण तालुक्यात चिकन आणि दही खाल्ल्यानंतर ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला
- दाम्पत्याने चिकन जेवल्यानंतर दही आणि दूध घेतले, ज्यामुळे उलट्या झाल्या.
- डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत विषबाधेची पुष्टी केलीली नाही
निलेश वाघ
चिकन खाल्ल्यावर दही खात आहात, तर सावधान! चिकनवर दही खाणे जीवावर बेतू शकते. नाशिकच्या बागलाण तालुक्यात चिकनच्या जेवणानंतर दही खाल्याने एका 68 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिचे 78 वर्षीय पती सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेने बागलाण तालुक्यात खळबळ उडाली आहे. चिकन-दही खाल्ल्यानेच हा अनर्थ घडला का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. डॉक्टरांनीही याबाबत आपली प्रतिक्रीया आणि सल्ला दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे गावात राहणाऱ्या शेतकरी दाम्पत्यसोबत हा प्रकरा घडला आहे.
या गावात शांताराम ह्याळीज आणि द्वारकाबाई ह्याळीज यांनी नेहमीप्रमाणे रात्री एकत्र जेवण केले.जेवणात चिकनचा बेत होता. जेवण झाल्यानंतर काही वेळातच दोघांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना उलट्या आणि असह्य त्रास होऊ लागला. घाबरलेल्या नातेवाईकांनी तात्काळ त्यांना नामपूर ग्रामीण रुग्णालयात नेले, पण दुर्दैवाने उपचारापूर्वीच द्वारकाबाई ह्याळीज यांचा मृत्यू झाला.तर दुसरीकडे पती शांताराम ह्याळीज हे मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. जेव्हा त्यांना रुग्णालयात आणले, तेव्हा त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. या घटनेनं गावात एकच खळबळ उडाली.
नक्की वाचा - Siya Goyal: सोनम सुटली! सिया गोयल ही जामीनावर सुटणार? कोर्टाच्या 'त्या' निकालाने खळबळ
या दाम्पत्याचा मुलागा दीपक ह्याळीज यांनी ही याबाबत माहिती दिली आहे. ते सांगतात की चिकन आधी मी खाल्ले होते. जवळपास एक तासानंतर आई-वडिलांनी जेवण केले. त्यानंतर एक ते दीड तासात त्यांना त्रास सुरू झाला. चिकन खाल्ल्यानंतर त्यांनी दही आणि दूधही घेतले होते. रुग्णालयात नेत असतानाच आईने प्राण सोडला, तर वडिलांना मालेगावला हलवावे लागले असं त्यांनी सांगितलं. याबाबत डॉ चंद्रकांत शेवाळे यांनी ही काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितले की मध्यरात्री पेशंट आमच्याकडे ऍडमिट झाले. त्यांची प्रकृती गंभीर होती.त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना अर्जंट व्हेंटिलेटरवर घेतले आहे.
डॉक्टरांनी पुढे म्हणाले की नातेवाईकांनी सांगितले की त्यांनी चिकन व त्यानंतर दही खाल्ले त्यामुळे विषबाधा झाली. मात्र प्राथमिक चाचणीत आम्हाला तसे काही आढळले नाही. आमच्याकडे तसा अहवाल नाही आता जरी ते व्हेंटिलेटरवर असले तरी प्रकृती स्थिर आहे. ते शुद्धीवर येत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण बागलाण तालुका हादरला असून नेमकी विषबाधा कशामुळे झाली, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान विषबाधेचे अनेक प्रकार आहेत. चिकनवर दही हे दोन्ही विरोधी अन्न आहे. त्यामुळे विषबाधा होऊ शकते मात्र जीव जावू शकतो असा गंभीर प्रकार आतापर्यंत पहिला नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जानकर सांगत आहेत.
डॉ. निखिल निकम यांनी सांगितले की शांताराम ह्याळीज यांना रात्री अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. ते आले तेव्हा त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण केवळ 55 टक्के होते. नातेवाईकांकडून चिकननंतर दही खाल्ल्याची माहिती मिळाली. मात्र, केवळ चिकन आणि दही हा 'विरुद्ध आहार' असल्यामुळे इतकी गंभीर विषबाधा होऊन जीवाला धोका निर्माण होतो, असे वैद्यकीयदृष्ट्या वाटत नाही. नेमके कारण काय आहे, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं. या विषबाधेच्या घटनेने गूढ वाढले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. अन्नाचे नमुने पुणे येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत.अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world