राहुल वाघ, नाशिक
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात आहे. "रांगेत उभे राहू नका, आम्ही तुम्हाला थेट दर्शन घडवून देतो," असे आमिष दाखवून दलाल आणि एजंट भाविकांकडून हजारो रुपये उकळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आधीच भाविकांना झालेल्या मारहाण प्रकरणामुळे मंदिर चर्चेत असताना आता या आर्थिक लुटीमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट आहे.
थेट दर्शनासाठी 3 ते 4 हजार रुपयांची मागणी
त्र्यंबकेश्वरमध्ये देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. गर्दीचा फायदा घेत काही स्थानिक दलाल भाविकांना गाठतात आणि व्हीआयपी दर्शनाचे आमिष दाखवतात. अधिकृत नियमानुसार व्हीआयपी दर्शनासाठी केवळ 200 रुपये फी आहे. मात्र, दलाल प्रत्येकी 3000 ते 4000 रुपये मागत आहेत. "आम्हाला सांगण्यात आले की रांगेत खूप वेळ लागेल, पैसे द्या आम्ही लगेच दर्शन करून देतो. श्रद्धेपोटी अनेकजण ही रक्कम देतात, पण ही उघड लूट आहे," अशी भावना एका भाविकाने व्यक्त केली.
पाहा VIDEO
Nashik | Trimbakeshwar Temple | त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची लूट; त्र्यंबकेश्वर मंदिर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले. | NDTV मराठी#nashiknews #trimbakeshwarjyotirlingatemple #ndtvmarathi #MaharashtraNews #nashiktemple pic.twitter.com/4S7TF3bbfW
— NDTV Marathi (@NDTVMarathi) April 6, 2026
(नक्की वाचा- Kalyan-Dombivli Schools: कल्याण-डोंबिवलीतील 'या' शाळा बेकायदा; यादी जाहीर, पालकांमध्ये चिंतेचं वातावरण)
मारहाण प्रकरणानंतर आता 'दलाल राज'
काही दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी भाविकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणाची मॅजिस्ट्रेट चौकशी अद्याप सुरूच आहे. असे असताना मंदिर परिसरात दलालांचे साम्राज्य निर्माण होणे, हे मंदिर प्रशासनाच्या आणि स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. हे दलाल थेट गाभाऱ्यापर्यंत भाविकांना कसे नेतात आणि यात कोणाचे साटेलोटे आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
(नक्की वाचा- Viral Video : "अंकल वाचवा, अंकल सोडवा..." पेरू तोडल्याची चिमुकलीला भयंकर शिक्षा, माजी सैनिकाला बेड्या)
प्रशासनाकडून कडक कारवाईची अपेक्षा
देवाच्या नावाखाली होणारी ही लूट केवळ व्यवस्थेचे अपयश नसून भाविकांच्या श्रद्धेचा विश्वासघात आहे. नाशिक जिल्हा प्रशासन आणि मंदिर विश्वस्त मंडळ या दलालांविरुद्ध काय पावले उचलणार? हा प्रश्न आता प्रत्येक भक्ताच्या मनात आहे. जर यावर तातडीने आळा बसला नाही, तर त्र्यंबकेश्वरची बदनामी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world