Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन झाले. हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) येत्या 25 डिसेंबरपासून हवाई सेवा सुरू करण्यास सज्ज झाले आहे. सुरुवातीला हे विमानतळ केवळ 12 तासांसाठी, म्हणजेच सकाळी 8 वाजल्यापासून कार्यरत राहणार आहे अशी माहिती समोर आली आहे. या विमानतळावरून उड्डाण करणारी पहिली विमान कंपनी म्हणून अकासा एअरने आपले वेळापत्रक जाहीर केले आहे. अकासा एअरने 25 डिसेंबर 2025 रोजी नवी मुंबईहून उड्डाण करणारे आणि उतरणारे पहिले विमान घोषित केले आहे. या उड्डाणासाह या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे.
पहिले विमान कोणते?
उतरणारे पहिले विमान कोणते आणि नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारे पहिले विमान कोणते असेल याची उत्सुकता सर्वानाच आहे. त्यानुसार 25 डिसेंबर रोजी दिल्लीहून सकाळी 5:25 वाजता निघणारे आणि सकाळी 8:10 वाजता नवी मुंबई विमानतळावर (QP 1831) उतरणारे अकासा एअरचे विमान पहिले असेल. म्हणजेच दिल्लीवरून येणारे विमान हे नवी मुंबई विमातळावर उतरणारे पहिले विमान असेल. ही विमान सकाळी पाच वाजून पंचवीस मिनीटांनी दिल्लीवरून निघेल. ते जवळपास आठ वाजून दहा मिनिटांनी नवी मुंबई विमानतळावर उतरेल. म्हणजेच जवळपास अडीच तासाने ते दिल्लीहून नवी मुंबईत उतरणार आहे.
उड्डाण करणारे पहिले विमान
नवी मुंबईतून पहिले उड्डाण देखील अकासा एअरचे (QP 132) असेल. जे सकाळी 8:50 वाजता दिल्लीसाठी निघेल. त्यानंतर ते तेवढ्याच वेळात म्हणजे अडीच तासानंतर दिल्लीला पोहोचणार आहे. अशा पद्धतीने नवी मुंबई विमानतळार उतरणारे आणि उड्डाण करणारे पहिले विमान हे दिल्लीचेच असणार आहे हे स्पष्ट झाले आहे. अकासा एअर नवी मुंबईहून दिल्ली, गोवा, कोची आणि अहमदाबादसाठी थेट उड्डाणे देणार आहे. ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होण्यात मदत होणार आहे.
इंडिगो आणि प्रमुख शहरे
अकासापाठोपाठ इंडिगो (IndiGo) ने देखील 25 डिसेंबरपासून आपले वेळापत्रक जाहीर केले आहे. इंडिगो, नवी मुंबईला देशातील 10 प्रमुख शहरांशी जोडणार आहे, ज्यात दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, लखनौ, उत्तर गोवा (मोपा), जयपूर, नागपूर, कोचीन आणि मंगलोर यांचा समावेश आहे. इंडिगोचे पहिले विमान नवी मुंबई-नागपूर असेल. हे विमान दुपारी 1:45 वाजता निघेल.
तिकीट बुकिंग आणि कनेक्टिव्हिटी
अकासा आणि इंडिगो या दोन्ही कंपन्यांनी 15 नोव्हेंबरपासून तिकीट बुकिंग सुरू केले आहे. त्यावर विमान प्रवासाच्या किंमती काय असतील हे स्पष्ट होणार आहे. मात्र सुत्रांनुसार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण होणाऱ्या विमान तिकीटा पेक्षा नवी मुंबई इथून जाणाऱ्या विमानाचे तिकीट हे जास्त असेल असे बोलले जात आहे. उलवे, पनवेल तालुक्यातील NH 4B आणि आमरा मार्ग रस्त्यांजवळ असलेल्या या विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) किंवा अटल सेतूमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. विशेषतः दक्षिण मुंबईहून 20 मिनिटांनी वेळेची बचत होईल. पनवेलहूनही नवी मुंबई एअरपोर्टला सहज पोहचता येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world