ज्येष्ठ नागरिक नेहमीच सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर असतात. कल्याणमध्ये असाच एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. एका 82 वर्षीय सेवानिवृत्त आजींना चक्क दहशतवादी हल्ल्याशी संबंध असल्याचा खोटा धाक दाखवून 73 लाख 30 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. 'डिजिटल अरेस्ट'च्या या नव्या प्रकारामुळे पोलीस प्रशासनही चक्रावून गेले आहे.
'पहलगाम' कनेक्शनचा बनाव
मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी कुलकर्णी या 82 वर्षीय आजींना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला तपास अधिकारी असल्याचे भासवले. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडले असून, त्याच्याकडे तुमचा मोबाईल क्रमांक सापडला आहे, असा बनाव भामट्यांनी केला. आजींना घाबरवून त्यांना 'डिजिटल अरेस्ट' खाली असल्याचे सांगण्यात आले. पुढील पाच दिवस त्यांना कोणाशीही बोलू न देता सतत फोनवर ठेवून मानसिक दबाव टाकण्यात आला.
(नक्की वाचा- VIDEO: मिरा-भाईंदरमधील रस्त्यावर 'झॉम्बी'? मुंबईसह परिसरात घबराट; काय आहे प्रकरण?)
निवृत्तीचे पैसे आणि उसने घेतलेली रक्कमही लुटली
बँक खात्यांची तपासणी सुरू असल्याचे सांगून आरोपींनी आजींना विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. आजींनी त्यांच्या निवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसे आणि काही रक्कम ओळखीच्या लोकांकडून उसने घेऊन भामट्यांच्या खात्यात जमा केली. 5 दिवसांनंतर जेव्हा त्यांना संशय आला आणि त्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्यांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून, ज्या खात्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत, त्यांचा तांत्रिक तपास सुरू केला आहे.
(नक्की वाचा- Political News: ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे बदल होण्याची शक्यता; '2003' ची पुनरावृत्ती?)
'डिजिटल अरेस्ट'पासून कसे वाचायचे?
पोलीस किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा तुम्हाला फोन किंवा व्हिडिओ कॉलवर कधीही 'अरेस्ट' करत नाही किंवा बँक खात्याची माहिती मागत नाही. सीबीआय, कस्टम किंवा पोलीस असल्याचे सांगून कोणी धमकावले तर तातडीने फोन कट करा. अशा वेळी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.