CM Devendra Fadnavis Latest News : राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालेल्या सामंजस्य करारामुळे पुण्यात पुढील दहा वर्षात जवळपास 400 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि एक हजारावर थेट रोजगाराची निर्मिती होणार आहे. त्यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल,असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या सामंजस्य कराराप्रसंगी फडणवीस यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र,उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी.अन्बळगण,गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे,अग्रेको इंडियाचे संचालक सन्नी ठकरार,ग्रुप प्रमुख स्टीफन रेआ, व्यवस्थापकीय संचालक राहुल खरे,हेड ऑफ प्रोक्युअरमेंट अँड ग्लोबल सप्लाय सुनील देशमुख,व्यापार सल्लागार मार्क बिरेल, वरिष्ठ व्यापार सल्लागार प्रतीक्षा क्षीरसागर आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की,पुणे आता ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचे महत्त्वाचे केंद्र बनत असून या जीसीसी कॅपिटलमध्ये अग्रेको कंपनीचे स्वागत आहे.भारतात विशेषतः महाराष्ट्रात,या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळेल.पुणे येथील प्रकल्पासाठी शासनाकडून आवश्यक परवानग्या,नोंदणी,मंजुरी,सवलती आणि अन्य प्रशासकीय बाबींमध्ये विद्यमान धोरणांनुसार सहकार्य करण्यात येणार आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागांच्या माध्यमातून या गुंतवणुकीला गती देण्यात येणार आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यात 'बोंबाबोंब' आंदोलन, 'या' भागातील 36 गावांवर मोठं संकट, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
या प्रकल्पामुळे स्थानिक पुरवठा साखळीला मोठी चालना
अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे.आज झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी व उत्पादन केंद्र उभारणार असून त्याचे काम यावर्षी मध्ये सुरु होणार आहे.हे केंद्र स्कॉटलंडबाहेरील ॲग्रेकोचे सर्वात महत्त्वाचे जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र असेल. या प्रकल्पामुळे स्थानिक पुरवठा साखळीला मोठी चालना मिळणार असून,सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योगांना जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.तसेच अत्याधुनिक उत्पादन,ऊर्जा उपकरण निर्मिती आणि प्रिसिजन इंजिनिअरिंग क्षेत्रात महाराष्ट्राची क्षमता अधिक मजबूत करण्यास हातभार लाभणार आहे.
नक्की वाचा >> Sindhudurg News: देवगडच्या 'त्या' समुद्र किनाऱ्यावर स्थानिकांसह पर्यटक हादरले, मुंबईच्या तरुणांसोबत भयानक घडलं
अग्रेको कंपनीचा कार्यक्षम ऊर्जा आणि शाश्वत तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना विकसित करण्यावर भर असणार आहे.विविध क्षेत्रांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे,कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि हवामान बदलांविरोधातील प्रतिकारक्षमता मजबूत करण्यासाठी ॲग्रेकोकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.त्याचबरोबरह राज्याच्या हवामान बदल कृती आराखड्याला पूरक ठरणाऱ्या शाश्वत ऊर्जा आणि तापमान नियंत्रण प्रणालींच्या प्रसारासाठी सहकार्य करण्याचीदेखील ग्वाही कंपनीने दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world