- पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी गावातील पारंपरिक स्मशानभूमीचा रस्ता रेल्वे प्रशासनाने अचानक बंद केला
- गावातील बहुतांश लोक मोलमजुरीवर अवलंबून असल्याने पर्यायी लांबचा मार्ग आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही
- नागरिकांना मृतदेह स्मशानभूमीकडे नेण्यासाठी धोकादायक रेल्वे रूळ ओलांडावे लागत आहेत
सूरज कसबे
व्यक्तीच्या मृत्यूनंतर तरी त्याची अंत्ययात्रा सुखासुखी निघावी ही सर्वांचीच अपेक्षा असते. पण काहींच्या नशिबी ते ही नसतं. त्याला कारण ठरतं ते प्रशासन. त्याचचं एक उदाहरण समोर आलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी गाव हे गाव आहे. हे गाव अस्तित्वात आल्यापासून येथील नागरिक स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पारंपरिक रस्त्याचा वापर करत होते. तो रस्ता 15 दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने अचानक बंद केला. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. येथील बहुतांश लोकसंख्या मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारी आहे. त्यामुळे इथं जर कुणाचा मृत्यू झाला तर पर्यायी लांबच्या मार्गाने स्मशानभूमीत जाणे त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.
त्यामुळे या गावातील लोकांना नाईलाजास्तव आणि अत्यंत धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडून मृतदेह स्मशानभूमीकडे न्यावा लागत आहे. अंतिम संस्कारासाठी मृतदेहाची होणारी ही हेळसांड पाहून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांना दररोज मृत्यूशी खेळतच अंत्ययात्रा काढावी लागत आहे. या गंभीर समस्येवर स्थानिक नागरिक प्रा. मनोज वाखारे यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता.
त्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी पुश ब्रिज उभारण्यासाठी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.आतापर्यंत केवळ 5 टक्केच काम पूर्ण झाले आहे. रेल्वे प्रशासन या कामात अजिबात सहकार्य करत नसल्याचा थेट आरोप गावकऱ्यांनी केला आहे. एकीकडे हक्काचा रस्ता बंद झाल्याने मरणयातना सोसाव्या लागत आहेत, तर दुसरीकडे मंजूर झालेल्या पुलाचे काम रेल्वेच्या उदासीनतेमुळे रखडले आहे.
या सर्व गोष्टींमुळे फुगेवाडीतील नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे. माणसाच्या मृत्यूनंतर तरी त्याची अंत्ययात्रा कोणत्या ही त्रासा शिवाय निघावी ही माफक आशा असते. पण तसे ही इथं होताना दिसत आहे. तिथे ही संघर्ष आणि अडचणीच आहे. शिवाय रेल्वे रूळ ओलांडताना काही अघटीत घडलं तर जबाबदार कोण असा प्रश्नही विचारला जात आहे. रेल्वे रूळ ओलांडताना अपघाताची भीती ही आहेच. त्याची टांगती तलवार गावकऱ्यांवर राहाणारच आहे. अशा स्थितीत लवकर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world