Raj Thackeray Slams Mohan Bhagwat Over Language Remarks: मुंबईमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दोन दिवसांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सरसंघचालकांनी भाषेबद्दल आग्रही राहणे आणि त्यासाठी आंदोलने करणे हा एक आजार असल्याचे वक्तव्य केले होते. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विधानावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत संघाची बाजू सावरून धरली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी मोहन भागवत यांच्या विधानाचा तीव्र निषेध करताना म्हटले की, भाषेबद्दलचे प्रेम आणि प्रांताबद्दलचा आदर हा जर आजार वाटत असेल, तर हा आजार संपूर्ण देशात पसरलेला आहे. कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब आणि अगदी गुजरातमध्येही आपली भाषा आणि प्रांताबाबत तीव्र अस्मिता आहे.
जेव्हा परराज्यातून येणाऱ्या झुंडी स्थानिक संस्कृतीला नाकारतात आणि भाषेचा अपमान करतात, तेव्हा स्थानिकांमध्ये रोष निर्माण होतो. याला आजार म्हणणे चुकीचे आहे. राज ठाकरे यांनी सरसंघचालकांना सवाल केला की, जेव्हा गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना पळवून लावले गेले, तेव्हा तिथे जाऊन तुम्ही समरसतेचे धडे का दिले नाहीत?
( नक्की वाचा : Salman Khan: RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानच्या उपस्थितीचं कारण काय? जाणून घ्या पडद्यामागची 'रिअल स्टोरी' )
कार्यक्रमातील उपस्थितीवर राज ठाकरेंची टीका
संघाच्या या व्याख्यान मालिकेला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या उपस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, तिथे आलेली मंडळी मोहन भागवत यांच्या प्रेमापोटी आली नव्हती, तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी यंत्रणेच्या भीतीमुळे आली होती.
यापूर्वी अशा रटाळ प्रवचनांना कोणीही फिरकत नव्हते, त्यामुळे हा आपला गैरसमज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, स्वतःला अराजकीय म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राजकीय भानगडीत का पडावे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
( नक्की वाचा : Mohan Bhagwat : 'हम दो, हमारे तीन'ची वेळ आली!लोकसंख्या धोरणावर RSS प्रमुख मोहन भागवत यांचा नवा फॉर्म्युला )
हिंदुत्व आणि बीफ एक्सपोर्टवरून संघाला घेरले
राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही संघाला धारेवर धरले. ते म्हणाले की, ज्यावेळी हिंदूंवर हल्ला होईल तेव्हा आम्ही हिंदू म्हणून उभे राहूच, पण हिंदुत्वाच्या नावाखाली जो धिंगाणा सुरू आहे त्यावर सरसंघचालक कधी बोलणार?
2014 मध्ये बीफ एक्सपोर्टमध्ये आपला देश 9 व्या क्रमांकावर होता, तो आता 2 क्रमांकावर आला आहे. गोहत्येचे राजकारण करून लोकांची माथी भडकवली जात आहेत, यावर व्यापाऱ्यांना आणि सरकारला खडे बोल कधी सुनावणार असा थेट सवाल त्यांनी केला. देशावर हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेचे धडे द्या, असेही त्यांनी याबाबतच्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं.
— Raj Thackeray (@RajThackeray) February 10, 2026
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु…
मुख्यमंत्र्याचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
राज ठाकरे यांच्या या आक्रमक टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, ज्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते, तेच आता टीका करत आहेत. संघाच्या 100 वर्षांच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात विधी क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते, ज्यांचा संघाशी कोणताही संबंध नव्हता. सरसंघचालकांनी सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे दिली आहेत.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, संघ विरोधी लोकांचे दुकान आता बंद होणार आहे, त्यामुळे अनेकांच्या मनात मळमळ सुरू झाली असून त्यातूनच ही टीका होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world