Thane News : ठाणे महानगरपालिका (TMC) क्षेत्रातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे यावर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी कालावधीत शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ नये, म्हणून जलसंपदा विभागासोबत 9 जून रोजी झालेल्या आढावा बैठकीत 20% पाणी कपात करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (MIDC) चालवल्या जाणाऱ्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरूवार, दिनांक 18 जून दुपारी 12 वाजल्यापासून ते शुक्रवार, दिनांक 19 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 24 तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)
'या' प्रभाग समित्यांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार
- दिवा प्रभाग समिती: सर्व भाग.
- कळवा प्रभाग समिती: सर्व भाग.
- मुंब्रा प्रभाग समिती: सर्व भाग (फक्त प्रभाग क्रमांक 26 आणि 31 चा काही भाग वगळून).
- वागळे प्रभाग समिती: रुपादेवी पाडा, किसननगर नंबर २ आणि नेहरुनगर.
- मानपाडा प्रभाग समिती: कोलशेत खालचा गाव.
(नक्की वाचा- Highway Light: महामार्गांवर स्ट्रीट लाईन का नसतात? अंधारात प्रवास का करावा लागतो? NHAI ने सांगितले कारण)
पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा
ठाणे महानगरपालिकेने नागरिकांना पूर्वकल्पना देताना स्पष्ट केले आहे की, शुक्रवार 19 जून रोजी 12 वाजता पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतरही यंत्रणेतील तांत्रिक कारणांमुळे पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे सर्व संबंधित भागातील नागरिकांनी गुरुवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवसांसाठी लागणारे पाणी आधीच साठवून ठेवावे. तसेच, या कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करून ठाणे महानगरपालिकेला सहकार्य करावे, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world