
Chhatrapati Sambhajinagar : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा परिसरात घडली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी चिकलठाणा हनुमान चौकात जालना रोडवर जोरदार रास्ता रोको आंदोलन छेडले होते. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तब्बल दोन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली होती. मृतांमध्ये कचरू जनार्दन दहीहंडे आणि बाळू उर्फ बालाजी जनार्दन दहीहंडे या काका पुतण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या वादळात या भागातील वीज वाहिनी तुटली होती. स्थानिकांनी याची वेळोवेळी माहिती महावितरणला दिली होती. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर आज ही दुर्दैवी घटना घडली असल्याचा आरोप होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून वादळी वारा पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले असून, तारा लोंबकळत आहे. शहराजवळ असलेल्या चिकलठाणा भागातील शेतात देखील महिनाभरापासून शेतात विद्युत खांब वाकला असून विद्युतवाहिन्या लोंबकळत आहे. त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी महावितरण कडे तक्रार केली होती. पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. अशात कचरू दहीहंडे आणि बालाजी दहीहंडे हे काका पुतण्यां पुतणे शेतात मशागतीच्या कामासाठी गेले होते. यावेळी त्यांचा शेतात पडलेल्या विद्युत वाहिन्यांचा शॉक लागून मृत्यू झाला.
ग्रामस्थ आक्रमक
कचरू दहीहंडे आणि बालाजी दहीहंडे यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळतात ग्रामस्थ आक्रमक झाले. चिकलठाणा येथील हनुमान चौकात ग्रामस्थांनी रस्ता रोको सुरू केला. पाहता पाहता मोठा जमाव रस्त्यावर जमला. संभाजीनगर शहरातून जाणारा जालना महामार्ग ठप्प पडला. परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी मोठा बंदोबस वाढवला. घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक लोकप्रतिनिधी देखील घटनास्थळी पोहोचले. मात्र ग्रामस्थ कुनाचही ऐकूण घेण्यास तयार नव्हते. तब्बल दोन तास हा महामार्ग पूर्णपणे बंद होता. शेवटी संबंधित दोषींवर कारवाईची लेखी हमी देण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी आपलं आंदोलन मागं घेतलं.
महावितरणचा भोंगळ कारभार...
पावसाळा सुरू झाल्यापासून महावितरण विभागाचा भोंगळ कारभार सतत समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील अनेक भागात तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडित होता. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतामध्ये विद्युत वाहिन्या खालील लोंबकळत असल्याचे चित्र आहे. तक्रार करून देखील महावितरणाचे कर्मचारी किंवा अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याचे आरोप होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world