राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद आणखी वाढणार? जितेंद्र आव्हाड नवा राजकीय डाव टाकण्याच्या तयारीत 

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कलानी गटाने पाठिंबा दिला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. 

Advertisement
Read Time: 2 mins

निनाद करमरकर, उल्हासनगर

उल्हासनगरमधील बलाढ्य कलानी गट येत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. याबाबतची घोषणा करण्यासाठी गोवा इथे सध्या कलानी गटाचं अधिवेशन सुरू  आहे.  या अधिवेशनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पप्पू कलानी आणि त्यांचा परिवार हा उल्हासनगरच्या राजकारणातील बलाढ्य परिवार म्हणून ओळखला जातो. पप्पू कलानी हे 1990, 1995, 1999 आणि 2004 असे सलग 4 वेळा उल्हासनगरचे आमदार म्हणून निवडून आले होते. तर त्यांच्या पत्नी ज्योती कलानी यादेखील 2014 साली उल्हासनगरच्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 

(नक्की वाचा - विधानसभा निवडणुकीत महायुतीचं जागावाटप कसं असेल; पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं)

सध्या भाजपाचे कुमार ऐलानी हे उल्हासनगरचे आमदार आहेत. मात्र सध्याची राजकीय समीकरणं पाहता पप्पू कलानी हे जेलमधून बाहेर आले असून त्यांचा मुलगा ओमी कलानी यांनी टीम ओमी कलानीच्या माध्यमातून शहरात ताकद निर्माण केली आहे. तर पप्पू कलानी यांनी सुद्धा शहर पिंजून काढत पुन्हा एकदा शहरावर असलेली पकड मजबूत केली आहे. 

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कलानी गटाने पाठिंबा दिला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपचे आमदार उल्हासनगरमध्ये असल्यामुळे कलानी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. 

Advertisement

( नक्की वाचा : मोठी बातमी : 'अमित शहांनी शब्द पाळला नाही', शिवसेना नेत्याची नाराजी उघड )

पप्पू कलानी यांचे सुपुत्र ओमी कलानी हे यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा असून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यासाठी सध्या गोवा इथे कलानी गटाचं अधिवेशन सुरू आहे. याच अधिवेशनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित राहिल्यामुळे कलानी गट शरद पवार गटातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे.