- वसईत एटीएममध्ये तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांना मागितल्यापेक्षा जास्त रक्कम पैसे मिळाल्या
- एटीएममधून काढलेली रक्कम जास्त असूनही खात्यातून फक्त मागितलेली रक्कमच डेबिट झाल्याची नोंद झाली होती
- तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आणि एटीएमसमोरील गर्दी वाढली होती
मनोज सातवी
आपण नेहमीच एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जात असतो. बँकेत जाण्या पेक्षा एटीएममधून पैसे काढणे हे कधी ही सोईचे. पण जर तुम्ही एटीएममध्ये गेलात आणि तुम्हाला हवे असलेल्या रक्कमे पेक्षा जास्त पैसे हातात आले तर? तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण असं झालं आहे. मागितले शंभर रूपये पण मिळाले 500 रूपये असचं काहीसं वसईमध्ये घडलं आहे. वसईतील गोलानी नाका परिसरातील हिताची एटीएममध्ये शनिवारी रात्री तांत्रिक बिघाड झाल्याने मोठा गोंधळ उडाला. एटीएममधून ग्राहकांनी जितकी रक्कम काढण्याची विनंती केली, त्यापेक्षा अनेक पटीने जास्त रक्कम मशीनमधून बाहेर येत असल्याचा प्रकार समोर आला.
एका ग्राहकाने 100 रुपये काढण्याची कमांड दिल्यानंतर एटीएममधून तब्बल 500 रुपये बाहेर आले. मात्र खात्यातून फक्त 100 रुपयेच डेबिट झाल्याची नोंद दिसत होती. तसेच 400 रुपये काढण्याची विनंती केल्यावर मशीनमधून 2000 रुपये बाहेर येत असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे पैसे काढण्यासाठी गेलेला ग्राहक चक्रावून जात होते. हा नक्की प्रकार काय आहे हे त्यांना समजायला मार्ग नव्हता. अशा वेळी करावे तरी काय अशा मनस्थितीत ते सापडले होते.
या प्रकाराची माहिती परिसरात वेगाने पसरल्यानंतर एटीएमबाहेर नागरिकांची गर्दी झाली. त्यांनाही एटीएममधून अधिक पैसे मिळत आहे हे समजले होते. त्यामुळे त्यांना ही पैसे काढायचे होते. काहीनी पैसे ही काढल्याचं समोर आलं आहे. अचानक निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत एटीएममधून व्यवहारच बंद केले. त्यानंतर तिथे जमलेल्या लोकांना ही पांगवण्यात आले. हा विषय कुतूहलाचा झाला होता.
घटनेची माहिती संबंधित बँक आणि तांत्रिक विभागाला देण्यात आली आहे. तांत्रिक पथक मशीनची तपासणी करत आहे. मशीन पूर्णपणे दुरुस्त झाल्यानंतरच एटीएम सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. बँकेने ही तातडीने कारवाई करत दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. वेळीच पोलीस आणि बँकेने पाऊल उचलले. नाही तर मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बँकेला बसला असता. आता हा तांत्रिक बिघाड दुर केल्यानंतर एटीएम सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण या एटीएमची चर्चा संपूर्ण शहरात रंगली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world