- श्रीक्षेत्र आगडगाव काळभैरवनाथ देवस्थानात गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रत्येक रविवारी अन्नदान सेवा दिली जाते
- अधिक मासाच्या पहिल्या दिवशी देवस्थानातून ६०० जावयांसाठी शाही आमरस आणि धोंडे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो
- धोंडे जेवणात आमरस, पुरणपोळी, कुरडई, पापड, आमटी आणि धोंडे मसाला पुरी यांचा पंचपक्वान्नाचा समावेश असतो
प्रसाद शिंदे
हिंदू धर्मातील महत्त्वाचा तीन वर्षातून एकदा येणारा अधिक मासाचा महिना आज सुरू होत आहे. अहिल्यानगर शहराजवळ असणाऱ्या श्रीक्षेत्र आगडगाव काळभैरवनाथ देवस्थान या ठिकाणी गेली 25 वर्षापासून अन्नदान सेवा प्रत्येक रविवारी दिली जाते. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये आमरसाचे जेवण या ठिकाणी दिलं जातं. तर अधिक मास तीन वर्षातून येणाऱ्या या महत्त्वाच्या महिन्यामध्ये गाव व परिसरातील जावयांना धोंडे जेवणाचा कार्यक्रम देखील आयोजित केला जातो. हे धोंडे जेवणाची काय पद्धत आहे ते आपण जाणून घेणार आहोत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धोंडे जेवणाचा कार्यक्रम अधिक मासाच्या पहिल्या दिवशीच आयोजित करण्यात आला होता. देवस्थानच्या वतीने 600 जावयांसाठी शाही आमरसाचा बेत ठेवण्यात आला होता. त्यासाठी तीन हजार पाचशे किलो आंबे, 1000 लिटर दूध आणि एक टन साखर यांच्या मिश्रणातून सात हजार लिटर आंब्याचा रस तयार करण्यात आला होता. 15 पातेले रस तयार केला होता. 1000 किलो हरभऱ्याची डाळ यापासून पुरण बनविण्यात आलं होतं. रविवारी दुपारी श्री काळभैरवनाथांची बारा वाजता महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली.
धोंडे जेवणामध्ये जावयाला पाच पोशाख केला जातो. त्याप्रमाणे मंदिर प्रशासनाच्यावतीने येणाऱ्या जावयांना कुर्ता पायजमा आणि मुलीला पैठणी साडीचा आहेर देण्यात येतो. राज्यातून अनेक जावई या ठिकाणी आज धोंडे जेवणासाठी आले होते. धोंडे जेवणामध्ये आमरस, पुरणपोळी, कुरडई, पापड, आमटी, धोंडे मसाला पुरी असा पंचपक्वान्नाचा बेत तयार करण्यात आला होता. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया येथील राकेश कुमार हे श्री काळभैरवनाथांचेभक्त देखील आज दर्शनासाठी आले होते. हा सर्व स्वयंपाक गावातील महिलां तयार करतात. वीस हजार भावीक जेवतील एवढा महाप्रसाद आज तयार करण्यात आला होता.
नक्की वाचा - CNG Prices Hike: महागाईचा भडका! दिल्ली मुंबईसह प्रमुख शहरांत CNG महागला, पाहा नवे दर
हिंदू संस्कृतीतील 'अधिक मास' हा तीन वर्षातून एकदा येतो. यावेळी जावयाला घरी बोलवून त्याचा पाहुणचार केला जातो. त्याला गोड जेवण दिलं जात. खास करुन पुरणाचे धोंडे त्यांना दिले जातात. त्यामुळे त्याला धोंडे जेवण असं म्हणतात. धोंडे जेवण ही एक प्रथा आहे. यात धोंडे बनवले जातात आणि ते जावयाला खावू घातले जातात. हे या प्रथेतील मुख्य पक्वान्न आहे. गव्हाच्या किंवा तांदळाच्या पिठात पुरण भरून उकडलेले किंवा तळलेले हे गोड गोळे असतात. ज्यांना 'धोंडे' म्हणता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world