
सूरज कसबे
पुण्यातील 5 तरुण वर्षा विहाराचा आनंद लुटण्यासाठी पानशेत परिसरात गेले होते. त्यावेळी एका स्थानिक नागरिकाने त्यांना सिगारेट ओढताना हटकले. त्यामुळे त्या तरुणांनी त्या नागरिकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर हे पाचही तरूण फरार झाले होते. अखेर पुणे ग्रामीण आणि वेल्हा पोलीस ठाण्यातील पथकाने या पाचही तरुणांना बेड्या ठोकल्या आहे. या पाचही जणांनी पानशेत येथील स्थानिक रहिवासी असलेल्या 24 वर्षीय रोहिदास काळूराम काटकर यांचा खून केला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या प्रकरणात आता पोलिसांनी आकाश सुभाष भिसे, भागवत मुंजाजी आसुरी , रितेश उत्तम जोगदंड , रमेश रामभाऊ शेळके, पांडुरंग भानुदास सोनवणे या तरुणांना अटक केली आहे. हे सर्व तरुण मूळचे परभणी जिल्ह्यातील असून ते सध्या नऱ्हे परिसरात राहत होते. आरोपी पानशेत परिसरात गेले असताना त्यांनी रोहिदास यास सुरुवातीला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या छातीवर दगड मारला होता. यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी वेल्हा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे या फरार आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जून रोजी पुण्याच्या नऱ्हे परिसरात राहणारे पाच मित्र हे पानशेत भागात फिरायला गेले होते. त्या परिसरातील एका हॉटेल बाहेर ते सिगारेट ओढत होते. त्यावेळी स्थानिक रहिवासी असलेल्या रोहिदास काटकरने त्यांना सिगारेट ओढू नका म्हणून हटकले. त्याचा त्यांना राग सहन न झाल्याने त्यांनी रोहिदास यास मारहाण केली. त्यानंतर यातील एका तरुणाने रोहिदास याचा छातीत दगड मारला.
हा घाव त्या तरूणाच्या वर्मी लागला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. तो मेला आहे हे आरोपींना समजले. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला होता. अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी या आरोपींना बेड्या ठोकल्यात आहेत. दरम्यान या घटनेनंतर पानशेत परिसरातील नागरिकांत भीती निर्माण झाली असून, पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांना शिस्त लावणे गरजेचे असल्याचं स्थानिक नागरिक म्हणू लागले आहेत. शिवाय त्यांच्यावर नियंत्रण ही ठेवले पाहीजे अशी मागणी ही होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world