Badlapur News: बदलापूरमधील पोतदार समृद्धी एव्हरग्रीन या इमारत संकुलात सध्या भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. रक्ताचे पाणी करून आणि आयुष्यभराची पुंजी जमा करून घेतलेल्या घरांवर अचानक जप्तीच्या नोटिसा डकवण्यात आल्याने शेकडो रहिवासी हवालदील झाले आहेत. आदित्य बिर्ला समूहाच्या प्रतिनिधींनी अचानक संकुलात येऊन घरे खाली करण्याचा इशारा दिल्याने नागरिक रस्त्यावर उतरले असून, बिल्डर आणि बँक यांच्यातील वादात सामान्य ग्राहकांना का भरडले जात आहे, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर ग्रामीण भागातील पोतदार समृद्धी संकुलात राहणाऱ्या अनेक रहिवाशांना खाजगी बँकेच्या प्रतिनिधींनी नोटिसा बजावल्या आहेत. रहिवाशांनी बिल्डरला घराचे पूर्ण पैसे दिले आहेत, काहींनी बँकांकडून कर्ज (Loan) घेऊन त्याचे हप्तेही नियमित भरले आहेत. तरीही बँकेचे अधिकारी घरी येऊन घर खाली करण्यास सांगत आहेत.

यामुळे स्वतःच्या हक्काच्या घरात राहूनही बेघर होण्याची भीती रहिवाशांच्या मनात निर्माण झाली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीती पाहायला मिळत आहे.
(नक्की वाचा : Pune News: मंचरमध्ये पुन्हा धार्मिक वादाची ठिणगी! मशिदीखाली भुयार सापडल्याच्या चर्चेनंतर आता बारवेवर रणकंदन )
रहिवाशांची आर्त हाक
या संकुलातील रहिवासी जवाहर सांगळे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, "आम्ही आयुष्यभराची जमापुंजी लावून घर विकत घेतले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून बँकेचे हप्तेही कापले जात आहेत. आता बँक आम्हाला घरे खाली करायला सांगत आहे. बिल्डर आणि बँकेमध्ये नक्की काय अडले आहे, याची आम्हाला कल्पना नाही. यात आमचा काय दोष?"

दुसरी रहिवासी सोफिया मलबारआला यांनी सांगितले की, त्यांनी 24 लाख रुपये रोख आणि चेकच्या स्वरूपात देऊन घर खरेदी केले होते. तरीही त्यांच्या घराला सील ठोकण्याचा प्रयत्न झाला. विष्णू शीरसागर या रहिवाशाने रडत रडत आपली कैफियत मांडली. घराच्या या मानसिक त्रासामुळे त्यांच्या आईची प्रकृती खालावली असून मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रहिवासी विभा राऊत यांनीही सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष देऊन सामान्य माणसाला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी बाळा कांबरी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बँकेच्या प्रतिनिधींना जाब विचारला. रहिवाशांची बाजू न्यायालयात मांडली आहे का, असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला असता त्यांनी टाळाटाळ केली. कांबरी यांनी स्पष्ट भूमिका घेतली की, कष्टकरी आणि सामान्य लोकांना कोणत्याही परिस्थितीत बेघर होऊ देणार नाही. त्यांनी सध्या बँकेच्या लोकांना तिथून पिटाळून लावले असून रहिवाशांना पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.
( नक्की वाचा : Dombivli News:कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात नवी ठिणगी! बस सेवेच्या उद्घाटनावेळी चव्हाणांचा सर्वात मोठा टोला )
बिल्डरची बाजू काय?
बिल्डर आणि आदित्य बिर्ला समूह यांच्यात नक्की काय व्यवहार झाला आहे किंवा कोणत्या आर्थिक कारणामुळे ही जप्तीची नोटीस आली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात पोतदार बिल्डरचे वकील अमेंद्र वर्मा यांच्याशी संपर्क साधला असता, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. या विषयावर उद्या सविस्तर प्रतिक्रिया दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या कायदेशीर लढाईत सामान्य मध्यमवर्गीय माणूस मात्र पुरता होरपळून निघाला आहे.
High
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world