Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर भीषण दरोडा, महिला टार्गेटवर; आधी कार थांबवली अन्...प्रवाशांमध्ये घबराट

उल्हासनगर येथील काही भाविक खाजगी कारने वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर दर्शनासाठी निघाले होते. त्यादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला.

जाहिरात
Read Time: 3 mins

Robbery on Samruddhi Highway :  एकेकाळी अपघातांच्या मालिकेमुळे चर्चेत राहिलेला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आता पुन्हा एकदा गंभीर घटनेमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी कारण आहे – महामार्गावरील थरारक लुटीची घटना. अतिवेगवान आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या द्रुतगती मार्गावर महिला प्रवाशांना मारहाण करून तब्बल ७० हजार रुपयांची लूट करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.


समृद्धी महामार्गावर दरोडा...

ही खळबळजनक घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कोनांबे गावाजवळ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. उल्हासनगर येथील काही भाविक खाजगी कारने वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर दर्शनासाठी निघाले होते. प्रवास शांतपणे सुरू असतानाच अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारला अडवून दरोडा टाकला. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी कार थांबवून महिला प्रवाशांना लक्ष्य केले. त्यांनी महिलांना बेदम मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम, तसेच सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. या लुटीत सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कारमधील सर्व प्रवासी भयभीत झाले. पीडित महिला दीपा रमेश वाधवा यांनी या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, महामार्गावरील टोल नाक्यांची नोंद तपासणे, तसेच संशयित वाहनांचा माग काढणे, या दिशेने पोलिसांची पावले सुरू आहेत. 

नक्की वाचा - Donation to Shirdi Sai Baba : सोन्याचे भाव गगनाले भिडले; साईबाबांच्या दरबारी मात्र सोन्याचं 'महादान'


समृद्धीवर कडक उपाययोजनेची मागणी...

समृद्धी महामार्ग हा राज्यातील महत्त्वाचा आणि आधुनिक सुविधा असलेला द्रुतगती मार्ग मानला जातो. मुंबई ते नागपूर असा लांब पल्ल्याचा प्रवास जलद आणि सुरक्षित व्हावा, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या महामार्गावर अशा प्रकारची घटना घडल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये आणि भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी या महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चर्चा रंगली होती. प्रशासनाने वेगमर्यादा, जनजागृती मोहीम आणि गस्त वाढवून अपघातांवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले होते. मात्र आता लुटीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांकडून महामार्गावर रात्रीच्या वेळी अधिक पोलीस गस्त, पेट्रोलिंग वाहनांची संख्या वाढवणे, तसेच संवेदनशील भागांत अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तातडीने उभारण्याची मागणी होत आहे. विशेषतः सिन्नर तालुक्यातील कोनांबे परिसरात सुरक्षेची कडक उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे पुढे आला असून प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महामार्ग सुरक्षित असला तरी प्रवाशांनीही विशेषतः रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेचा तपास सुरू असून पुढील तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

Advertisement