Kalyan Bike Robbery Case : कल्याणमधून चोरीच्या घटनेची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मज्जा,मस्ती आणि रायडिंगसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या 4 तरुणांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. समर्थ पाटील,हर्ष परदेशी, प्रणित शितप आणि सागर ढवळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हे चारही आरोपी केवळ फिरण्यासाठी आणि मजा करण्यासाठी दुचाकी चोरी करत होते.विशेष म्हणजे,आरोपी चोरी केलेली बाइक काही अंतरापर्यंत फिरवायचे. दुचाकीमधील पेट्रोल संपले की ती दुचाकी तिथेच सोडून द्यायचे.त्यानंतर पुन्हा नवीन बाइक चोरी करून रायडिंग करायचे.
पोलिसांनी चोरट्यांकडून सात दुचाकी केल्या जप्त
दरम्यान, बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून या तरुणांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून 7 वेगवेगळ्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.आरोपींनी आणखी काही चोरीचे गुन्हे केले आहेत का?याचाही तपास पोलिसांकडून सुरु आहे.याबाबतची माहिती कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली आहे.
नक्की वाचा >> Sangli News: येरळा नदीत 8 मुलं बुडाली..नदीकाठावर असलेले पालकही पाण्यात उतरले, पण शेवट झाला सर्वात भयंकर
तपास अधिकारी प्रशांत आंधळे काय म्हणाले?
याबाबत तपास अधिकारी प्रशांत आंधळे यांनी म्हटलंय की, "या प्रकरणात सीसीटीव्हीच्या साह्याने सर्वात आधी एका आरोपीला अटक करण्यात आली होती. त्या आरोपीने सांगितलं की, माझे काही मित्र देखील असच करतात. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. विशेष म्हणजे हे चौघे फक्त स्कुटी चोरायचे. चारचाकी चोरून त्या वाहनाची कोणाला विक्री केली आहे का, याबाबतची कोणतीही माहिती समोर आली नाही. यासंदर्भात कल्याणची डीसीपी अतुल झेंडे एसीपी अशोक होनमाने बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.