Mumbai Crime : नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली 'दिल्ली क्राइम' सीजन ३ सारखाच प्रकार मुंबईसह महाराष्ट्रभरात घडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गरीबीचा फायदा उचलत अल्पवयीन मुलींना मोठमोठी स्वप्न दाखवली जातात आणि त्यांची परदेशात विक्री केली जाते. अशा मुलींना कोणीच वाली नसतो... त्यात गरीबीचा चिमटा... त्यामुळे त्या जिवंत राहिल्या काय किंवा मृत्यू झाला... कोणाला कळत नाही आणि फरकही पडत नाही. या वेब सीरिजच्या माध्यमातून देशातील भयाण वास्तव समोर ठेवण्यात आहे. असाच प्रकार महाराष्ट्रातूनही समोर आल्यानं चिंता वाढली आहे.
पोलिसांच्या कारवाईत धक्कादायक प्रकार....
अनेक राज्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे पुरुषांना लग्न करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे दलालांकडून मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या भागातून गरीब मुलींना राजस्थान, अहमदाबादमधील गावांमध्ये विकलं जात आहे. या गरीब मुलींना लग्नासाठी एक ते पाच लाखांना विकलं जात असल्याचं भयाण वास्तव समोर आलं आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईतून ही मोठी बाब उघड झाली आहे.
मुलींचं अपहरण अन् मग लग्न...
अनेकदा गरीबीचा फायदा उचलत, पैशांचं अमिष दाखवित त्यांचं लग्न लावुन दिलं जातं. कधी त्यांचं अपहरण केलं जातं. तर कधी पैशांसाठी मुली मर्जीने तयार होतात. यासाठी अल्पवयीन मुलींना जास्त मागणी असल्याचं अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीत वेळोवेळी समोर आलंय. राजस्थान, गुजरात आणि हरियाणा या भागात मुलींचा जन्मदर कमी असल्याने विवाहासाठी महाराष्ट्रातून वधू शोधमोहीम राबवली जाते. त्याचाच फायदा घेत दलाल मुली विकण्याचं रॅकेट चालवित आहे, लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
नवी मुंबईतही अल्पवयीन मुली बेपत्ता...
शहरात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. २८ नोव्हेंबर, शुक्रवारी तुर्भे आणि NRI पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार मुली बेपत्ता झाल्या होत्या. अद्याप त्यांचा शोध लागलेला नसतानाच पुन्हा दोन मुली रहस्यमयरीत्या गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 363 (अपहरण) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world