Mumbai High Court Verdict : संसारात होणारे वाद आणि मतभेद ही एक सामान्य बाब असून केवळ याच कारणावरून जोडीदाराला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा दोषी धरता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. वैवाहिक आयुष्यातील कलह हे अनेकदा नैराश्याचे कारण ठरू शकतात, मात्र जोपर्यंत आरोपीने प्रत्यक्ष चिथावणी दिली असल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याला गुन्हेगार मानता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महिलेविरुद्धचा खटला रद्द करताना हा निकाल दिला असून यामुळे वैवाहिक वादाच्या प्रकरणांमध्ये कायद्याची दिशा स्पष्ट झाली आहे.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण अमरावती येथील असून एका 49 वर्षीय शिक्षिका असलेल्या महिलेविरुद्ध 2019 मध्ये आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या महिलेच्या पतीने नोव्हेंबर 2019 मध्ये आत्महत्या केली होती, त्यानंतर त्याच्या पालकांनी सुनेवर गंभीर आरोप करत तक्रार दिली होती.
पती आणि त्याच्या नातेवाईकांचा असा आरोप होता की, संबंधित महिला त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करत असे, तसेच स्वतः आत्महत्या करण्याची आणि त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असे. या त्रासाला कंटाळून पतीने टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा सासरच्या मंडळींनी केला होता.
( नक्की वाचा : माहेरच्यांनी 22 वर्षे ऐकला नाही आवाज! फरार कल्पना खरातच्या भावाचा आणि वडिलांचा दुर्दैवी अंत; पाहा वास्तव )
न्यायालयाने नोंदवलेली महत्त्वाची निरीक्षणे
न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सखोल सुनावणी घेतली. न्यायालयाने म्हटले की, आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यासाठी आरोपीने प्रत्यक्ष भूमिका बजावली होती, हे सिद्ध होणे आवश्यक आहे. पीडित व्यक्तीला जीव देण्यासाठी प्रोत्साहित करणे किंवा तसा कट रचणे या गोष्टी फिर्यादी पक्षाला दाखवून द्याव्या लागतात.
केवळ संतापाच्या भरात जोडीदाराने उच्चारलेले शब्द किंवा घरातील रोजचे वाद हे आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा ठरवण्यासाठी पुरेसे नाहीत. या प्रकरणात पती आणि पत्नी दोघांनीही एकमेकांवर छळाचे आरोप केले होते, जे वैवाहिक जीवनात सामान्य मानले जाऊ शकतात.
( नक्की वाचा : Pune News: आजोबाच झाला हैवान, 'ते' भूत डोक्यात गेलं आणि 6 वर्षांच्या नातीसह 2 जणांची हत्या केली ! )
सुसाईड नोटमधील मजकूर ठरला कळीचा मुद्दा
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे मृताने मागे ठेवलेली सुसाईड नोट होती. या चिठ्ठीमध्ये संबंधित पतीने कुठेही आपल्या पत्नीने चिथावणी दिली असल्याचा उल्लेख केला नव्हता. उलट, आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्यात स्पष्टपणे म्हंटले होते.
जेव्हा मृत व्यक्ती स्वतः कोणाला जबाबदार धरत नाही, तेव्हा केवळ जुन्या वादांच्या आधारावर गुन्हेगारी हेतू स्पष्ट होत नाही. जास्तीत जास्त असे म्हणता येईल की, कौटुंबिक वादामुळे तो पुरुष नैराश्यात असावा, पण तो गुन्हा ठरत नाही.
वैवाहिक वादात गुन्हेगारी हेतू आवश्यक
न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, एखाद्या व्यक्तीला आत्महत्या करण्यासाठी आरोपीकडून थेट आणि प्रत्यक्ष चिथावणी मिळणे गरजेचे आहे. माहिती किंवा विशिष्ट हेतूशिवाय दिलेली प्रतिक्रिया म्हणजे चिथावणी नव्हे. या दांपत्याचा विवाह डिसेंबर 1996 मध्ये झाला होता आणि तेव्हापासून त्यांच्यात विविध कारणांवरून मतभेद होते.
महिलेने देखील सासरच्या मंडळींकडून आपला शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा दावा केला होता. हे संपूर्ण प्रकरण वैवाहिक वादाचे आणि एकमेकांवरील छळाच्या आरोपांचे असल्याने, न्यायालयाने संबंधित महिलेविरुद्धचा गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world