
प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी
Nandurbar Pickup Tempo Accident : सातपुड्यातील अस्तंबा अर्थात अश्वस्थामा यात्रेतून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या वाहनाला काल शनिवारी (१८ ऑक्टोबर ) सकाळी झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू, तर २८ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तळोदा-धडगाव रस्त्यावर चांदसैली घाटात ही घटना घडली. अपघातातील मृत आणि जखमी हे नंदुरबार तालुक्यातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये पवन गुलाब मिस्तरी (२४), बापू धनगर (२४), चेतन पावबा पाटील (२३), भूषण गोसावी (३०) वाहनचालक राहुल गुलाब मिस्तरी (२३, सर्व रा. घोटाणे), योगेश लक्ष्मण ठाकरे (२८), हिरालाल जगन भिल (३८, रा. कोरीट), गणेश संजय भिल (१३, रा. शबरी हट्टी, नंदुरबार) यांचा समावेश आहे. धनत्रयोदशीनिमित्त सातपुड्यातील अस्तंबा अर्थात अश्वस्थामाची यात्रा भरते. या रस्त्यावर घाटाच्या वळणावर चालकाचा अचानक ताबा सुटल्याने वाहन घाटाखाली कोसळल्याने वाहनात बसलेल्यांना काही कळायच्या आत ते दाबले गेले. त्यामुळे जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये पाच जवळचे घट्ट मैत्री असलेल्या मित्रांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी या यात्रेवेळी काढलेले ते शेवटचे फोटो पाहून हळहळ व्यक्त होत आहे.
अस्तंबा ऋषींच्या शिखरावर दर्शनासाठी जाण्याचा निर्णय
दर्शनासाठी सातपुड्यातील अस्तंबा ऋषींच्या शिखरावर गेलेल्या सात मित्रांचा परतीच्या प्रवासात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. घोटाणे येथील पाच तर कोरिट गावातील दोन तरुणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन तरुण कामानिमित्त दररोज दुसऱ्या गावात जात होते. तेथे त्यांची पाच तरुणांशी ओळख झाली आणि हळूहळू ती घट्ट मैत्रीत बदलली. दिवाळीच्या सुटीत सर्वांनी मिळून सातपुड्यातील अस्तंबा ऋषींच्या शिखरावर दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. ते सर्वजण एक दिवस आधीच शिखरावर पोहोचले आणि तिथं त्यांनी दर्शन घेतलं. त्य वेळी त्यांनी मोबाईलमध्ये एकत्र अनेक फोटो काढले, सेल्फी घेतले आणि आठवणी जपल्या. मात्र, नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते. दर्शनानंतर सर्व मित्र पिकअप वाहनात बसून परतीच्या प्रवासाला निघाले असता वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात घोटाणे येथील पाच आणि कोरिट येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. काही क्षणांपूर्वी आनंदात काढलेला त्यांचा सामूहिक फोटो हा शेवटचा ठरला.
जागोजागी मोबाइलमध्ये एकत्र फोटो काढले..
कोरीट येथील योगेश लक्ष्मण ठाकरे आणि हिरालाल जगन भील हे दोघे कामानिमित्त दररोज घोटाणे गावात जात होते. तेथे त्यांची ओळख पवन गुलाब मिस्तरी, बापू छगन धनगर, चेतन पावबा पाटील, भूषण राजेंद्र गोसावी आणि राहुल गुलाब मिस्तरी या तरुणांशी झाली. सततच्या भेटीगाठींमुळे त्यांच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली. दिवाळीच्या सुटीत सर्वांनी मिळून सातपुड्यातील अस्तंबा ऋषींच्या यात्रेला जाण्याचे ठरवले. नियोजनाप्रमाणे ते सर्वजण शिखरावर पोहोचले, दर्शन घेतले आणि जागोजागी मोबाईलमध्ये एकत्र फोटो काढले. परंतु, त्यांच्या आनंदाच्या क्षणांना काही तासांतच काळाने घाला घातला.
नक्की वाचा - 'बसमध्ये बसलोय...' तो शेवटचा कॉल ठरला; दिवाळीसाठी घरी निघालेला जितेश जिवंत जळाला...कुटुंबावर दु:खाचा डोंगर
कुटुंबीयांचा आक्रोश आणि दुःखद दृश्याने सर्वांचे डोळे पाणावले
धनत्रयोदशीच्या दिवशी १८ ऑक्टोबरला सकाळी ते परतीच्या प्रवासाला निघाले. एम-३९-एबी-२८०२ क्रमांकाच्या पिकअप वाहनात सातही मित्रांसह तब्बल ३५ जण बसले होते. चांदशैली घाट उतरत असताना सकाळी साडेदहा वाजता वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी सात मित्रांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पवन गुलाब मिस्तरी (२४), बापू छगन धनगर (२४), चेतन पावबा पाटील (२३), भूषण राजेंद्र गोसावी (३०), राहुल गुलाब मिस्तरी (२२), हिरालाल जगन फडके आणि योगेश लक्ष्मण ठाकरे यांचा समावेश आहे. अस्तंबा यात्रेतील त्यांनी काढलेले फोटोच त्यांच्या आठवणी ठरल्या. दीपोत्सवाच्या काळात या दोन गावांवर शोककळा पसरली असून, कुटुंबीयांचा आक्रोश आणि दुःखद दृश्याने सर्वांचे डोळे पाणावले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा तपास सुरू केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world