Nashik News : नाशिकमधून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर नाशिकमधील पर्यटकांच्या त्यातही महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिकच्या इगतपुरी परिसरातील भावली धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या कारवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करीत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असून यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पर्यटकांच्या गाडीवर लोखंडी रॉड भिरकावला, भागवत कुटुंब भयभीत
मिळालेल्या माहितीनुसार, भागवत कुटुंब नाशिकमधून रविवारी आपल्या कुटुंबासोबत पर्यटनासाठी भावली धबधबा येथे गेले होते. यावर त्यांच्या कुटुंबावर काही गावगुंडांनी हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. फिरायला गेलेला कुटुंबापैकी एका महिलेकडे बघून टवाळखोरांनी शिट्टी वाजवत छेड काढल्यावरून भागवत कुटुंबासोबत त्यांचा वाद झाला होता. टवाळखोरांनी या कुटुंबाच्या कारचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला केला. लाकडी दांडे आणि लोखंडी रॉड गाडीवर भिरकावल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. याशिवाय या गावगुंडांनी गाडीची तोडफोडही केली. हल्ला होताच भागवत यांनी गाडी पळवल्याने जीव वाचल्याचा दावा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोरांनी १० ते १५ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून ठिकठिकाणी त्यांच्यावर हल्ले केलं.
महिलेचा विनयभंग...
स्थानिक गुंडांनी महिला पर्यटकांचा विनयभंग केल्याची माहिती आहे. या गावगुंडांनी पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करत काचा फोडल्या. पर्यटकांचा मोबाईल फोन आणि गळ्यातील चेनही चोरल्या. बाईकवरून गुंडांनी पर्यटकांचा पाठलाग केला. MH 46 BE 3721 क्रमांकाच्या कारने पाठलाग केला. दोन जणांनी MH 15 KA 4502 या क्रमांकाच्या बाईकने पाठलाग केला.
या प्रकरणी नाशिकच्या इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीसांकडून संयुक्तपणे आरोपींचा शोध घेतला जात आहे.