- राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai News: ऐरोली परिसरात सोमवारी (6 एप्रिल) मध्यरात्री गोळीबाराची थरारक घटना घडली आहे. ऐरोली सेक्टर 1 मधील छत्रपती शिवाजी रहिवाशी चाळ परिसरात अज्ञात इसमाने केलेल्या गोळीबारात अमित मौर्य हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे प्रचंड वातावरण पसरले असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
ऐरोलीमध्ये नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, 6 एप्रिल 2026 रात्री 11.50 वाजेच्या सुमारास अमित मौर्य आणि संदीप गवस हे दोघे ऐरोली सेक्टर 1 परिसरात उभे होते. यावेळी एका मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात इसमाने त्यांच्यावर अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. हल्लेखोराने सुमारे चार राऊंड फायरिंग केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात एक गोळी अमित मौर्य यांच्या मानेत लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
उपचारासाठी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवले
घटनेनंतर जखमी अमित मौर्य यांना तातडीने ऐरोली येथील इंद्रावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने आणि गोळी मानेत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
सीसीटीव्हीमध्ये कैद झाला हल्लेखोरघटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक संशयित इसम मोटारसायकलवरून येऊन गोळीबार करताना स्पष्टपणे दिसून आला आहे.
पोलिसांचा तपास सुरूजखमी अमित मौर्य यांनी अद्याप कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही, त्यामुळे या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. रबाळे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथके तयार केली असून विविध कोनातून तपास सुरू केला आहे. मध्यरात्री झालेल्या या गोळीबारामुळे ऐरोली परिसरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world