मुख्यमंत्री शिंदेंची मध्यस्थी, अंबरनाथमधला पेच सुटला? किणीकर -वाळेकर वाद मिटला

या बंडाला साथ देणारे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांचे नाव पहिल्या यादीत नव्हते. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. किणीकर यांना वेटींगवर ठेवण्यात आले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
अंबरनाथ:

शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे यांना त्यावेळी चाळीस पेक्षा जास्त आमदारांची साथ मिळाली. यातील बहुतांश आमदारांना एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संधी दिली आहे. पहिल्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या बंडाला साथ देणारे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांचे नाव पहिल्या यादीत नव्हते. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. किणीकर यांना वेटींगवर ठेवण्यात आले होते. त्याला कारण होते स्थानिक नेत्यांचा त्यांना होत असलेला विरोध. मात्र यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोडगा काढला असून अंबरनाथ मधला पेच सुटल्याचे बोलले जात आहे. असं असलं तरी अंबरनाथची उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यात वाद होता. किणीकर यांच्या उमेदवारीला वाळेकर यांचा विरोध आहे. या विरोधामुळेच किणीकर यांना पहिल्या यादीत उमेदवारी मिळू शकली नव्हती. त्यामुळे हा वाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. किणीकर हे तीन वेळा आमदार झाले आहेत. असं असलं तरी शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्याबरोबर त्यांचे पटत नाही. शिवाय तीन वेळा आमदार असल्याने त्यांच्या विरोधात नाराजी आहे असा युक्तीवाद केला जात होता. अशा स्थितीत बंडाला साथ देवून ही किणीकर यांचे नाव पहिल्या यादीत येवू शकले नव्हते.  

ट्रेंडिंग बातमी - चला उमेदवारी अर्ज भरायला! 'हे' दिग्गज भरणार आज उमेदवारी अर्ज

अशा स्थिती शिंदेंनी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री शिंदेंनी या दोघांमध्ये समन्वय राखण्यासाठी बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना आदेश दिले. त्यानुसार बुधवारी रात्री अंबरनाथच्या शिवसेना शहर शाखेत अरविंद वाळेकर आणि बालाजी किणीकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वामन म्हात्रे, राजेंद्र चौधरी हे देखील उपस्थित होते. मागच्या गोष्टी विसरून पक्षाचा आमदार निवडून आणण्या करता सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची भूमिका घेण्यात आली. या दोघांमध्ये समन्वय राहावा यासाठी म्हात्रे आणि चौधरी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?

या बैठकीनंतर किणीकर आणि वाळेकर यांच्यातील वाद मिटल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत या दोघांनीही कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी यशस्वी मध्यस्थी केली असल्याचे बोलले जात आहे. मात्र ती खरोखर झाली आहे की नाही  हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. किणीकर यांना अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यांनी अजूनही प्रतिक्षा करावी लागणार आहे. अशा वेळी वाळेकर गट काय भूमीका घेतो हे ही महत्वाचे ठरणार आहे. अंबरनाथ मतदार संघ हा श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदार संघात येतो. त्यामुळे इथे धोका पत्करणे शिंदेंना परवडणारे नाही.