- मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौरपदावर भाजपसोबत वाद करण्याचा सध्या कोणताही मानस नसल्याचे स्पष्ट केले आहे
- शिवसेनेला महापौरपद मिळावे अशी भावना असून मात्र भाजपकडून ही मागणी मान्य होण्याची शक्यता कमी आहे
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला मिळून बहुमताचा आकडा गाठता आला आहे. त्यामुळे महापौरपदावरून आतापासूनच भाजप आणि शिवसेनेत दावे-प्रतिदावे केले जात आहे. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला जो जनादेश मिळाला आहे, त्याचा पूर्ण आदर केला जाईल, असे संकेत शिंदे यांनी दिले आहेत. महापौरपदावरून भाजपसोबत वाद निर्माण करण्याचा शिंदे यांचा सध्या तरी कोणता मानस नाही असं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आलं आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे किमान अडीच वर्षांसाठी शिवसेनेला महापौरपद मिळावे, अशी शिवसैनिकांची भावना आहे. मात्र, संख्याबळ पाहता भाजप ही मागणी मान्य करण्याची शक्यता कमी आहे. याची शिंदे यांना जाणीव आहे. तरीही, आपल्या कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष होऊ नये आणि पक्षात 'बॅकफूट'वर गेल्याचा संदेश जाऊ नये, यासाठी ते सावध पवित्रा घेत आहेत. महापौरपद न मिळाल्यास मुंबई महापालिकेतील इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये वाटा मिळवण्यासाठी ही एक राजकीय खेळी असू शकते, असे बोलले जात आहे.
शिवसेनेच्या 29 नवनिर्वाचित नगरसेवकांना अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. शिंदे गटाकडून मात्र हे केवळ 'प्रशिक्षण शिबीर' असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नवनिर्वाचित सदस्यांशी संवाद साधणे आणि त्यांना कामकाजाची ओळख करून देणे हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र त्या मागे आणखी काही कारणं दडली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदे यांचे नगरसेवक फुटणार तर नाहीत ना अशी ही एक चर्चा सुरू आहे. त्याला कारण ही तसेच आहे. ठाकरे सेना काँग्रेसच्या सोबतीने काही नगरसेवक फोडले तर सत्तेचा सोपान चढू शकतात. याची कल्पना शिंदेंना आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
महापौर पद:
- शिवसेनेकडून महापौर पदासाठी आग्रह धरला जात असल्याची चर्चा आहे, मात्र शिंदेंनी अद्याप कोणताही दावा अधिकृतपणे केलेला नाही.
समिती वाटप:
- महापौर पद भाजपकडे गेल्यास, स्थायी समिती किंवा इतर वैधानिक समित्यांमध्ये शिवसेनेला मोठे स्थान मिळण्याची शक्यता आहे.
कार्यशाळा:
- मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये नगरसेवकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे. जेणेकरून नवनिर्वाचित सदस्यांना महापालिकेच्या नियमावलीची माहिती मिळेल.
शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आश्वस्त केले आहे की, मुंबईच्या विकासकामांमध्ये शिवसेनेचा वाटा महत्त्वाचा राहील आणि भाजपसोबत समन्वय राखूनच पुढील पावले उचलली जातील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world