'यशाचे बाप अनेक असतात आणि अपयश'... राज्यातील भाजपाच्या पराभवावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis on BJP Defeat : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपाच्या पराभवाची कारणं सांगताना मोठं वक्तव्य केलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
मुंबई:

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये (Lok Sabha Elections 2024 Result) राज्यात भाजपाचा मोठा पराभव झाला. गेल्या लोकसभा निवडणुकीत 23 जागा मिळवणाऱ्या भाजपाला या निवडणुकीत फक्त 9 जागा मिळाल्या आहेत. या पराभवावर विचारमंथन करण्यासाठी राज्य भाजपाच्या विधीमंडळ गटाची बैठक मुंबईत झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील भाजपाच्या पराभवाची कारणं सांगताना मोठं वक्तव्य केलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले फडणवीस?

नरेंद्र मोदी देशाच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. पंडित नेहरुंच्या रेकॉर्डची त्यांनी बरोबरी केलीय. देशानं पुन्हा एकदा मोदीजींवर आणि एनडीएवर विश्वास दाखवला आहे. आपण (महाराष्ट्र) तो वाटा 2014 आणि 2019 प्रमाणे उचलू शकलो नाही याचं दु:ख आहे. यश आलं नाही याची कारणं शोधत कशी दूर करता येतील, याबाबत पुन्हा एकदा स्ट्रॅटर्जी आखावी याचा निर्धार केला असल्याचं त्यांनी सांगितलं.

पावसाळा जवळ आहे जे पेरलं जातं तेच उगवत असतं. नव्याने पेरण्याची वेळ आली आहे. यशाचे बाप अनेक असतात अपयश पचवायचे असते आणि नवा निर्धार करायचा असतो मी नेतृत्व करत असल्याने अपयशाची जबाबदारी माझीच आहे, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. मी पळणारा व्यक्ती नाही, लढणारा व्यक्ती आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. 

( नक्की वाचा : 'मला सरकारमधून मोकळं करावं', देवेंद्र फडणवीस यांची मागणी )
 

फडणवीसांना विनंती

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मुक्त करावं ही मागणी केली होती. ही भूमिका त्यांनी मागं घ्यावं असा ठराव विधीमंडळ गट आणि प्रदेश भाजपानं केलाय. त्यांनी सरकारमध्ये राहून काम करां असा हा ठराव आहे. आमची विनंती फडणवीस मान्य करतील, असं मत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (रविवार, 9 जून) रोजी शपथ घेणार आहेत. विधीमंडळातील गटातील सर्वच आमदार आम्ही या कार्यक्रमाला जाणार आहोत. शपथविधी कार्यक्रम होत असताना सर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून जल्लोष होणार असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

Advertisement

( नक्की वाचा : फडणवीसांच्या राजीनामा प्रस्तावावर अमित शाहांकडून आलं उत्तर, म्हणाले....)
 

फडणवीस सरकारमध्ये राहणार

महाराष्ट्रात झालेल्या भाजपाच्या पराभवाची जबाबदारी स्विकारुन देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळं करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शहा यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देण्याचा आदेश दिला आहे. फडणवीस यांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हा आदेश दिला. त्यापाठोपाठ महाराष्ट्र भाजपानं तसा ठराव संमत केल्यानं देवेंद्र फडणवीस आता सरकारमध्ये राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.