समाधान कांबळे
नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून सध्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे. त्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्या अनेक ठिकाणी चुरस आहे. शिवाय एकमेकांचे कार्यकर्तेही एकमेकांना भिडताना दिसत आहे. त्यात एकमेकांचे कार्यकर्तेही आपल्या पक्षात ओढून घेण्याची स्पर्धा लागली आहे. हे कमी की काय आता हिंगोलीतल्या या दोन्ही पक्षाच्या आमदारांनी एकमेकांवर इतक्या खालच्या पातळीवर आरोप केले आहेत की ते ऐकून सर्वच जण आवाक झाले आहेत. हिंगोलीत मागील काही दिवसांपासून नगरपरिषद निवडणुकीचा आखाडा तापला आहे. महायुतीमध्ये सोबत असलेल्या मित्र पक्षातील हिंगोलीतील शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये मागील काही दिवसांपासून चांगली शाब्दिक चकमक पहायला मिळत आहे.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातील अनेक भागांमध्ये राजकीय पक्षांकडून कॉर्नर सभा घेतल्या जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी काल एका कॉर्नर सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीक केली. ते म्हणाले आमदारांनी माझ्या घरी 100 पोलीस पाठवून माझ्या घराची चेकिंग केली. त्यामुळे वातावरण तापलं.संतोष बांगर यांनी केलेल्या आरोपाला मग भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी ही तातडीने जशाच तसे प्रत्युत्तर दिले.
मुटकुळे म्हणाले नगरपरिषद निवडणुका निर्भीड वातावरणात हव्यात ही आमची भावना आहे. यासाठी हिस्ट्रीसीटर लोकांच्या घराचा झडती घेण्याचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. आमदार बांगर यांच्यावर 2012-13 मध्ये खूनाचा गुन्हा दाखल होता. हिंगोली जिल्हा न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावली होती. त्यानंतर डेप्युटी कलेक्टर यांनी बांगर यांना जिल्ह्यातून हद्दपार देखील केलं होतं. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या कारणामुळे त्यांच्या घराची झडती घेतली असेल असा टोला कुटकुळे यांनी लगावलाय. त्यात त्यांच्या घरी पोलीस पाठवण्याचा माझा काय संबंध आला असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत बांगर यांची पार कोंडी केली.
नक्की वाचा - Tata Sierra: टाटा सिएराची धमाकेदार एन्ट्री! किंमत, फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल,'आहा!,
भाजप आमदार मुटकुळेंनी केलेल्या या जहरी टिकेने शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर बिथरले. बांगर यांनी मग आपल्याच मित्र पक्षाच्या आमदारावर खालच्या पातळीत टीका केली. ते म्हणाले तानाजीराव तुमच्यासारखं तोंड काळ करायचं काम संतोष बांगरने केलं नाही. या जिल्ह्याचे नाव लौकिक करण्याचं काम संतोष बांगर यांने केलं. या आमदारापासून माझ्या मायबाप जनतेने माता-भगिनींनी सावध राहावं असे देखील बांगर म्हणाले. पुढे ते म्हणाले यांची नजर वाईट आहे. अशा माणसाला जर घरात घेतलं तरी महापाप होईल असं बांगर म्हणाले.
नक्की वाचा - Sindhudurg News: राणेंनी डाव टाकला! मालवण नगरपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, कोण चेकमेट होणार?
हिंगोलीत मुख्यमंत्री आल्यानंतर ते मला शाब्बासकी देतील. तर बांगर यांना एकनाथ शिंदे हे तंबी देवून जातील असं मुटकुळे म्हणाले. तर बांगर यांनी त्यावर बोलताना संतोष बांगर कलदार शिक्का आहे. तुमच्या सारखा नाही. जिथे जाईल तिथे तोंड काळ करेल असा नाही. असं म्हणत त्यांनी मुटकुळे यांना टोला लगावला. तुम्हाला हिंगोलीतल्या लोकांनी काळ तोंड्या म्हणावं. ऐवढचं नाही तर, तानाजीराव माझ्याकडे तुमची एक क्लिप आहे. ती क्लिप जर बाहेर काढली तर तुम्हाला फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही अशी धमकी वजा दम ही बांगर यांनी दिलाय. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने या दोघांमधील वाकयुद्ध पराकोटीला गेलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world