Maharashtra Elections 2026 : राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीचं वारं सुरू आहे. गल्लोगल्ली प्रचार सुरू आहे. पुढील काही दिवस असंच काहीसं चित्र राज्यभरात पाहायला मिळेल. कार्यकर्ते प्रचारात दंग आहेत. गर्दी कमी दिसू नये यासाठी भाडोत्री कार्यकर्ते शोधून आणले जात आहेत. त्यांना यासाठी पगारही दिला जात आहे. हे चित्र कमी-अधिक प्रमाणात सर्वच पक्षांच्या बाबतीत दिसत आहे. निवडणूक म्हटली की उमेदवारांना कार्यकर्त्यांसाठीचा एक वेगळा निधी बाजूला काढावा लागतो. दिवसभरात प्रचार करणाऱ्या भाडोत्री कार्यकर्त्यांसाठी मात्र यानिमित्ताने सुगीचे आणि कमाई करण्याचे दिवस आहेत.
दररोज हजार रुपये अन् भरपेट जेवण...
मुंबईसह कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक प्रचारातही हेच काहीसं चित्र आहे. सध्या प्रचाराचा जोर वाढला आहे. ठिकठिकाणी पदयात्रा, प्रचारसभा, चौक सभा, डोअर-टू-डोअर प्रचार, बाईक रॅली आयोजित केली जात आहे. अशावेळी कार्यकर्ते कमी पडू नये यासाठी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर भाडोत्री कार्यकर्ते जमा करण्याची जबाबदारी असते. मात्र या भाडोत्री कार्यकर्त्यांचीही मोठी मागणी असते. त्यांना दररोज ८०० ते १००० रुपये रोजंदारी दिली जाते. त्याशिवाय कुणाकडून शाकाहारी तर कुणाकडून मासांहारी जेवणाची मागणी केली जाते. याशिवाय 'श्रमपरिहार'ची सोय करावी अशीही सूचना वजा मागणी केली जाते.
दुपारी नो प्रचार...
प्रचाराचा जोर दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी मस्ट असते. त्यामुळे भाडोत्री कार्यकर्त्यांचं मन दुखावून चालत नाही. १५ जानेवारी रोजी मतदान आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाडोत्री कार्यकर्त्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे हे भाडोत्री कार्यकर्ते प्रचारात उतरताना आपल्या अटी पुढे ठेवतात. खाणं-पिणं आणि मानधनाव्यतिरिक्त भाडोत्री कार्यकर्त्यांचा पुणे पॅटर्नही पाहायला मिळतोय. पदयात्रेसाठी सकाळी ९ ते १ किंवा दुपारी ४ ते ८ यावेळेत आम्ही उपलब्ध असू अशी अट कार्यकर्त्यांकडून घातली जात आहे. दुपारी १ ते ४ या काळात ऊन जास्त असतं, त्यामुळे दमलेले भाडोत्री कार्यकर्ते या काळात आराम करण्यासाठी दुपारी प्रचार करणार नसल्याचं सांगत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
