मनोज सातवी, प्रतिनिधी
Mira-Bhayandar Municipal Corporation Election : मीरा–भाईंदर महापालिका निवडणुकीदरम्यान एक अत्यंत दु:खद घटना घडली आहे. ३० डिसेंबरला महापालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. राज्यातील अनेक जिल्ह्यात यादरम्यान गोंधळ पाहायला मिळाला. यादरम्यान मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीदरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अजित पवार गटाच्या उमेदवाराचा मृत्यू
काल ३० डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. जावेद पठाण (वय ६६) असं मृत उमेदवाराचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जावेद पठाण यांनी सकाळी १० ते ११ या वेळेत प्रभाग क्रमांक २२ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मीरा रोड येथील हैदरी चौक परिसरात त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे मीरा–भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत हा प्रकार घडल्याने सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मीरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सर्वच पक्षांकडून जावेद पठाणच्या निधनावर शोक व्यक्त केली जात आहे.
कधी आहे निवडणूक?
मीरा-भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. त्याचा निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी समोर येतील. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानुसार, मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. ३० डिसेंबर २०२५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख २ जानेवारी २०२६ आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
