
Big B Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन हे भारतातील महान सुपरस्टार्सपैकी एक आहेत. हिंदी चित्रपटांप्रमाणेच त्यांनी इतर भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात अमिताभ बच्चन यांचा मोठा वाटा असून आजही त्यांचा एक मोठा चाहतावर्ग आहे. 90 च्या दशकात एकवेळ अशी आली होती की अमिताभ बच्चन यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला होता. कारकिर्दीच्या शिखरावर असताना भारत देश सोडून इतर देशात स्थायिक होण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता, आणि याबद्दल अनेकांना माहिती नाहीये. अमिताभ यांनी भारतापासून 6900 किलोमीटर दूरवर असलेल्या देशात स्थायिक होण्याचं निश्चित केलं होतं आणि ते स्थायिक देखील झाले.
कारकिर्दीच्या शिखरावर असताना अमिताभ बच्चन यांना आपल्या कामात साचलेपणा आल्याचे वाटू लागले होते. वेगळेपणाची आस असलेल्या अमिताभ बच्चन यांनी यामुळे चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. अमिताभ बच्चन भारतातून दूर, स्वित्झर्लँडला जाऊन स्थायिक झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबातील कोणीही नव्हतं, ते एकटेच परदेशात स्थायिक झाले होते. तिथे त्यांनी एक दोन महिने नाही तर तब्बल 2 वर्ष घालवली होती. या संपूर्ण काळात ते एकांतवासात होते. स्वित्झर्लँडमधून बच्चन दोन वर्षांनी परत आले तेव्हा त्यांच्या मनातील साचलेपणा दूर झाला होता आणि नव्या दमाने कामासाठी ते सज्ज झाले होते. भारतात परत आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी स्वत:ची कंपनी सुरू केली. 'अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड' (ABCL) नावाने त्यांनी ही कंपनी सुरू केली होती. व्यवसाय करणे बहुधा त्यांना जमले नाही आणि त्यांची कंपनी दिवाळखोरीत गेली होती.
नक्की वाचा :'महाभारत' हा आमिर खानचा शेवटचा चित्रपट असेल! तो म्हणाला...
दिवाळखोरीत गेलेली कंपनी, वाढणारे कर्ज यामुळे अमिताभ बच्चन यांना त्यांचे जुहू येथील घर विकावे लागले होते. 2000 साली त्यांच्याकडे 'कौन बनेगा करोडपती'चे सूत्रसंचालन आले आणि परिस्थिती पूर्णपणे बदलली. हा क्विझ शो आणि त्यानंतर आलेला 'मोहब्बतें' या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांच्या करियरला कलाटणी मिळाली होती आणि अमिताभ बच्चन यांनी पुन्हा नवी शिखरे सर करण्यास सुरूवात केली. ही सगळी कहाणी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी सांगितली आहे. 'वेट्टैयान' चित्रपटाच्या ऑडिओ लाँचवेळी रजनीकांत यांनी ही सगळी कहाणी सांगितली होती.
नक्की वाचा : अभिनेता अर्शद वारसीवर SEBI नं घातली बंदी
अमिताभ बच्चन हे आपल्यासाठी आदर्श असल्याचे रजनीकांत यांनी प्रांजळपणे सांगितले. त्यामागचे कारणही त्यांनी समजावून सांगितले. "कारकिर्दीच्या शिखरावर असताना, वयाच्या 57-58 व्या वर्षी अमितजींना कंटाळा आला होता. त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केले आणि तिथे एकटे राहू लागले. ते एकांतात राहात होते।हे पाहून मीसुद्धा बंगळुरूमध्ये असे करण्याचा प्रयत्न केला होता. अमितजी एक-दोन वर्षांनी परत आले आणि त्यांनी एबीसीएल सुरू केली. त्यांना विविध भाषांमध्ये चांगले चित्रपट बनवायचे होते. पण हा प्रयत्न फसला. जर तुम्ही सावधगिरी बाळगली नाही, तर तुम्ही अडचणीत सापडता."
रजनीकांत यांनी म्हटले की, जेव्हा अमिताभ बच्चन आर्थिक संकटात सापडले, तेव्हा अनेक लोकं त्यांच्या पतनाचा आनंद साजरा करत होते. जेव्हा तुम्ही उंचीवर जाता, तेव्हा अनेक लोक तुमच्या पडण्याची वाट पाहत असतात. कधीकधी, ते तुमच्या पडण्याची वाटही पाहत नाहीत. ते तुमच्या छोट्याशा चुकीबद्दलही आनंद साजरा करतात.अमिताभ बच्चन अपयशाने खचले नाहीत त्यांनी पुन्हा उभे राहण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 82 व्या वर्षी, ते दिवसातील दहा तास काम करतात, जिममध्ये घाम गाळत ते दिवसाची सुरुवात करतात."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world