टीव्ही अभिनेत्री संचिता उगाले (Sanchita Ugale) हिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिचे चाहते प्रचंड धक्क्यात आहेत. संचिताने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या प्रकरणादरम्यान तिचा जवळचा मित्र आणि सहकलाकार सोरब बेदी याला सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागत आहे. संचिताच्या मृत्यूनंतर पॅपराजीशी बोलतानाचा सोरबचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून युजर्स त्याच्यावर प्रचंड भडकले आहेत.
सोरब बेदीवर का भडकले सोशल मीडिया युजर्स?
संचिताच्या निधनाने दुःखी झालेल्या नेटकऱ्यांना पॅपराजीशी संवाद साधतानाचा सोरबचा अंदाज अजिबात आवडला नाही. संचिताच्या मृत्यूचे सोरबला थोडेही दुःख नाही, असे त्याच्या वागण्यावरून वाटत असल्याचा आरोप युजर्सने केला. सोरबच्या इंस्टाग्राम कमेंट सेक्शनमध्ये सध्या त्याच्यावर टीका करणाऱ्या भरपूर कमेंट्स येत आहेत.
हसतमुख चेहरा आणि टीका
सोरब अतिशय शांत आणि चेहऱ्यावर हलके हास्य ठेवून संचिताच्या आत्महत्येबद्दल बोलत होता, ही गोष्ट युजर्सनी प्रकर्षाने हायलाइट केली. एका युजरने संतापून लिहिले, "भावा, तिने सुसाइड केले आहे, लग्न नाही... एवढा आनंद कशाचा आहे? तर दुसऱ्याने लिहिले, "हा माणूस इतका इमोशनलेस कसा असू शकतो? हा तर तिचा मित्र होता." याशिवाय, संचिता तुला वारंवार फोन का करत होती, असे संशयास्पद प्रश्नही काहींनी उपस्थित केले जात आहेत.
सोरबने बोलताना फक्त एवढेच सांगितले होते की, संचिता काही दिवसांपासून मानसिक तणावात होती; परंतु हा ताण नेमका कशाचा होता, हे त्याने स्पष्ट केले नव्हते.
(नक्की वाचा- Sanchita Ugale: 'टॉर्चर, छळ, डिप्रेशन', संचिता उगले मृत्यू प्रकरणात धक्कादायक वळण, वडिलांनी सगळ सांगितलं)
सोरब बेदीने दिलं स्पष्टीकरण
सोशल मीडियावर वाढता गदारोळ आणि ट्रोलिंग पाहिल्यानंतर सोरब बेदीने स्वतः समोर येत इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीला त्याने 'भाई सोच समझकर बोल' असे कॅप्शन दिले आहे.

आपली बाजू मांडताना सोरब म्हणाला, "माझे अलीकडेच संचिताशी बोलणे झाले होते. ती मला बऱ्याच दिवसांपासून फोन करत होती. पण त्यावेळी मी सिलिगुडी येथे होतो. जेव्हा पॅपराजी माझ्याशी बोलायला आले, तेव्हा तिथे प्रचंड गर्दी होती आणि प्रत्येकाचे प्रश्न मला स्पष्ट ऐकू येत नव्हते. 'ती तुला का फोन करत होती?' असा प्रश्न मला कोणीतरी विचारला होता. पण गोंधळामुळे मी सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकलो नाही. मी लवकरच तिथला मूळ व्हिडिओ शेअर करेन, जेणेकरून तिथे किती गर्दी होती हे सर्वांना दिसेल." पुढे बोलताना सोरब भावूक झाला आणि म्हणाला, "लोक मला इमोशनलेस म्हणत आहे. पण कालपासून मी संचिताच्या घरी किती फोन केले आहेत आणि मी किती संपर्कात आहे, हे फक्त मलाच ठाऊक आहे."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world