
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी चीनबाबत एक वक्तव्य केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात ते विद्यार्थ्यां बरोबर चर्चा करत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. कोणतेही उत्पन्न उत्पादीत करण्यात चीन जगात आघाडीवर आहे. त्यामुळेच त्यांना बेरोजगारीची समस्या उद्भवत नाही. त्या तुलनेत भारत आणि अमेरिकेत बेरोजगारीची मोठी समस्या आहे. भारतीय तरूण कशातही कमी नाहीत. पण त्यांना रोजगार देणे गरजेचे आहे. त्यासाठी रोजगार निर्मिती करणे गरजेचे आहे. तसं झाल्यास भारत नक्कीच चीनला टक्कर देवू शकतो. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपनं जोरदार टिका केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राहुल गांधी हे या आधीही चीन बाबत केलेल्या वक्तव्यामुळे विवादात सापडले होते. या आधी 2017 साली भारत आणि चीनमध्ये सीमा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे भारत चीन सीमेवर तणाव निर्माण झाला होता. चीनच्या घुसखोरीला भारतीय सैन प्रत्युत्तर देत होती. त्याच वेळी राहुल गांधी यांनी चीनच्या राजदूतांची भेट घेतली होती. त्यावेळी राहुल गांधी काँग्रेसचे खासदार होते. शिवाय पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर होती. त्यांच्या या भेटीवर जोरदार टिका झाली होती. हे प्रकरण वाढत असताना राहुल गांधी यांनी स्वत: याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं.

त्यांनी त्या वेळी ट्वीट करत आपली भूमिका मांडली होती. त्यात त्यांनी सांगितलं की देशाच्या महत्वाच्या गोष्टींची माहिती घेणं हे आपलं काम आहे. मी चीनी राजदूताला भेटलो हे सत्य आहे. त्यांच्या बरोबर मी माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनाही भेटलो. भूतानच्या राजदूत आणि काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबरही चर्चा केली. पण सरकारला माझ्या आणी चीनी राजदूताच्या भेटीवर आक्षेप का आहे. जर सीमेवरून भारत चीन वाद आहे तर त्याच वेळी केंद्राचे तीन मंत्री चीनच्या दौऱ्यावर का आहेत याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल असे राहुल गांधी म्हणाले.
It is my job to be informed on critical issues. I met the Chinese Ambassador, Ex-NSA, Congress leaders from NE & the Bhutanese Ambassador
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 10, 2017
राहुल गांधी हे 2019 साली मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. त्यावेळी ही वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी चीनच्या काही मंत्र्यांची भेट घेतली होती. यावरून भाजपने त्यांच्या विरोधात टिकेची झोड उठवली होती. या भेटी बाबत राहुल गांधी यांनी सरकारला कोणतीही माहिती दिली नव्हती असा आरोप भाजपने केला होता. त्यानंतर राहुल गांधी हे भारतात आले. त्यावेळी त्यांनी भूवनेश्वरमध्ये एक सभा घेतली. त्यात त्यांनी आपण चीनच्या दोन मंत्र्यांना भेटल्याचं सांगितलं. शिवाय त्यांच्या बरोबर रोजगार निर्मिती बाबत चर्चा केल्याचे स्पष्टीकरण दिलं.

त्यावेळी राहुल गांधी यांनी आपण चीन बरोबर स्पर्धा केली पाहीजे असे वक्तव्य केले होते. चीन सर्वाधिक रोजगार निर्माण करत आहे. हेच आपल्या समोरील आव्हान असल्याचेही ते बोलले होते. चीन जास्त रोजगार निर्माण करत आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल असंही ते म्हणाले होते. राहुल गांधी ज्या ज्या वेळी चीन बाबत बोलले आहेत काही ना काही वाद नक्कीच निर्माण झाला आहे. आताही त्यांनी अमेरिकेत रोजगार निर्मिती बाबत चीन विषयी बोलले आहेत. त्यामुळे भाजप त्यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world