जाहिरात
Story ProgressBack

राम नाईक, राजदत्तंसह महाराष्ट्रातील पाच जणांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

Read Time: 4 min
राम नाईक, राजदत्तंसह महाराष्ट्रातील पाच जणांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान
नवी दिल्ली:

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणा-या ‘पद्म पुरस्कार-2024' चे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार' प्रदान करण्यात आले. यामध्ये माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, दिग्गज अभिनेत्री वैजयंतीमाला बाली, अभिनेता  मिथुन चक्रवर्ती , सुप्रसिध्द गायिका उषा उत्थप  या काही मान्यवरांचा समावेश आहे.  तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परराष्ट्र मंत्री, एस.जयशंकर तसेच केंद्रीय मंत्री उपस्थित होते. पहील्या टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील पाच मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राम नाईक


माजी केंद्रीय मंत्री राहिलेले राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राम नाईक यांनी वयाच्या 35 व्या वर्षी नोकरी सोडली. त्यानंतर ते राजकारणात गेले. खासदार व केंद्रीय मंत्री व राज्यपाल अशी पदे त्यांनी भुषविली आहेत.  1989, 1991, 1996, 1998 व 1999 लोकसभा निवडणुकीत  उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल पदही भुषविले आहे. त्यांच्या अथक प्रत्यनांमुळे उत्तर प्रदेशला स्थापनेनंतर 68 वर्षांनी उत्तर प्रदेश दिवस साजरा करण्यास मिळाला.

Latest and Breaking News on NDTV

राजदत्त


दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त या नावाने प्रख्यात असलेले राजदत्त यांना त्यांनी दिलेल्या कला क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करणत आले. त्‍यांच्या चित्रपटसृष्टीतील 50 वर्षांपेक्षा जास्त कामगिरीचा हा मोठा सन्मान आहे. राजदत्त यांनी आजवर तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे प्रथम पुरस्कार 8 वेळा, 3 द्वितीय आणि 2 तृतीय असे तब्बल 13 राज्य चित्रपट पुरस्कार पटकावले आहेत. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मधुचंद्र' या पहिल्याच चित्रपटाला त्यांना उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. यासोबतच ‘राघूमैना', ‘देवकीनंदन गोपाला', ‘माझं घर माझा संसार', ‘शापित', ‘पुढचं पाऊल', ‘हेच माझं माहेर', ‘अरे संसार संसार, ‘मुंबईचा फौजदार' या सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन केले आहे. 92 वर्षांच्या राजदत्त यांनी चित्रपटसृष्टीत 50 वर्षांपेक्षा अधिक वर्षांचे योगदान आहे.

Latest and Breaking News on NDTV

डॉ. जहीर इसहाक काझी 


डॉ. झहीर काझी यांना त्यांनी साहित्य व शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल  पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. गेल्या 40 वर्षांपासून ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्यात 150 वर्षे जुन्या अंजुमन-इ-इस्लामचे प्रमुख म्हणून 13 वर्षांचा समावेश आहे. ज्यात 97 शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, अनाथाश्रम आणि इतर शैक्षणिक संस्थेमार्फत चालतात. नवीन पनवेल येथे 10.5 एकर जागेवर पसरलेल्या अभियांत्रिकी, आर्किटेक्चर आणि फार्मसी आणि पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर कार्यक्रम देणारे एकात्मिक तांत्रिक कॅम्पस तसेच विधी महाविद्यालयाची स्थापना करण्याचे श्रेय त्यांना मिळाले आहे. 

Latest and Breaking News on NDTV

कल्पना मोरपरिया  


कल्पना मोरपारिया यांनी व्यापार व उद्योग क्षेत्रात दिलेल्या  उत्कृष्ट योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. कल्पना मोरपरिया या एक भारतीय बँकर आहेत. आयसीआयसीआय बँकेत त्यांनी दीर्घ सेवा दिली असून,सध्या त्या जेपी मॉर्गन इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी अनेक आघाडीच्या भारतीय कंपन्यांच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून काम केले आहे. त्या मुंबई विद्यापीठातून कायद्याचे पदवीधर आहेत आणि त्यांनी भारत सरकारने स्थापन केलेल्या अनेक समित्यांवर काम केले आहे. फॉर्च्युन मासिकाने आंतरराष्ट्रीय व्यवसायातील पन्नास सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक म्हणून त्यांनी स्थान मिळविले आहे.

Latest and Breaking News on NDTV

डॉ मनोहर कृष्ण डोळे  


औषधी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत आज डॉ डोळे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ डोळे हे धर्मादाय नेत्र रुग्णालय चालवतात, त्याची स्थापना 1982 मध्ये झाली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यातील विविध भागात दर महिन्याला 10 ते 12 मोफत नेत्रशिबिरांचे आयोजन करतात. वर्षानुवर्षे, त्यांच्याद्वारे चालवलेले फाउंडेशनमार्फत, नारायणगाव, पुणे आणि आसपासच्या वंचित ग्रामीण तसेव आदिवासी लोकांना नेत्रसेवा पुरवत .असतात. नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्रसेवा देत अमूल्य योगदान दिले आहे.

Latest and Breaking News on NDTV

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination