Chandra Grahan 2026: यंदा 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले पूर्ण चंद्र ग्रहण लागणार आहे. सामान्यतः ग्रहणाच्या काळात मंदिरांचे दार बंद केले जातात आणि पूजा-पठण रोखले जाते. कारण ग्रहणाच्या वेध काळात देवीदेवतांच्या मूर्तींना स्पर्श करू नये, असे म्हणतात. पण देशातील अशी काही मंदिरे आहेत, जेथे हे नियम लागू होत नाही. ग्रहणातही या मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी खुले असतात. यामागील कारण देखील खास आहेत, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
1. उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर
उज्जैन शहरातील महाकालेश्वर मंदिर हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. हे भगवान शिवशंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असून या मंदिराचे दरवाजे कधीच बंद होत नाहीत. येथे महाकाल स्वरूपात भगवान शिव प्रकट झाले आहेत आणि त्यांच्यावर ग्रहणाचा कोणताही परिणाम होत नाही, असे मानले जाते. त्यामुळे ग्रहण असो वा अन्य काही कारण या मंदिराचे मुख्य द्वार नेहमी खुले असते आणि भाविक नित्य पूजा करू शकतात.

2. दिल्लीचे कालकाजी मंदिर
दिल्लीतील कालकाजी मंदिरही या बाबतीत खूप प्रसिद्ध आहे. अशी मान्यता आहे की, कालका देवी या कालचक्राच्या स्वामिनी आहेत आणि सर्व ग्रह-नक्षत्र त्यांच्या नियंत्रणात आहेत. याच कारणामुळे ग्रहणाचा या मंदिरावर कोणताही परिणाम होत नाही. ग्रहण काळातही भक्त येथे दर्शनासाठी येतात.
3. उत्तराखंडातील कल्पेश्वर मंदिर
उत्तराखंडचे कल्पेश्वर मंदिर देखील ग्रहणादरम्यान भाविकांसाठी खुले असते. येथे भगवान शिवशंकराने माता गंगेचा वेग नियंत्रित केला होता, असे मानले जाते. याच कारणामुळे या मंदिराचे दरवाजे बंद केले जात नाहीत.
4. थिरुवरप्पु येथील श्री कृष्ण मंदिर
केरळच्या कोट्टायममधील थिरुवरप्पु येथील श्री कृष्ण मंदिर अतिशय आगळेवेगळे आहे. येथे भगवान श्रीकृष्णाला दिवसातून 10 वेळा नैवेद्य अर्पण केला जातो. देवाला खूप भूक लागते, अशी यामागील श्रद्धा आहे. त्यामुळे भगवंताची ही भूक लक्षात घेऊन ग्रहणातही मंदिराचे पट बंद केले जात नाहीत, जेणेकरून देवाला नैवेद्य अर्पण करता येईल.
(नक्की वाचा: Chandra Grahan 2026: धूलिवंदनाला दिसणार Blood Moon, चंद्रग्रहण कधी सुरू होणार? सुतक काळ,मोक्षस्नानाची वेळ वाचा)
5. गया येथील विष्णुपद मंदिर
बिहारमधील गया येथील विष्णुपद मंदिरही विशेष आहे. येथे पितृदोषासाठी केल्या जाणाऱ्या पिंडदानाचे विशेष महत्त्व आहे. ग्रहणाच्या काळातही या मंदिराचे दरवाजे खुले ठेवले जातात, जेणेकरून भाविक आपल्या पूर्वजांच्या आत्मतृप्तीसाठी पिंडदान करू शकतील.
(नक्की वाचा: Chandra Grahan 2026 Time: पुणे-मुंबईसह 35 जिल्ह्यांतील चंद्रग्रहणाची अचूक वेळ, सुतक काळ आणि नियम सविस्तर वाचा)
6. बिकानेरचे लक्ष्मीनाथ मंदिर
राजस्थानच्या बिकानेरमधील लक्ष्मीनाथ मंदिराची कथाही अनोखी आहे. एकदा ग्रहणात मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले होते आणि देवाला नैवेद्य मिळाला नाही, असे म्हटले जाते. तेव्हा देवाने स्वतः एका मिठाईवाल्याच्या स्वप्नात जाऊन आपल्याला भूक लागल्याचे सांगितले. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली की ग्रहण काळात या मंदिराचे दरवाजे कधीही बंद केले जात नाहीत.
(Disclaimer ही माहिती सामान्य मान्यता आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. एनडीटीवी या माहितीची पुष्टी करत नाही.)
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world