जाहिरात

Monsoon Health Tips: पावसाळ्यात आजारी पडायचं नसेल तर या 7 गोष्टींपासून राहा दूर, डॉ मिगलानींनी दिला 'हा' इशारा

Monsoon Health Tips: पावसाळ्यात संसर्ग आणि पोटाचे आजार टाळण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे, याबाबत डॉक्टर अमित मिगलानी यांनी दिलेला आहाराचा सल्ला आणि महत्त्वाच्या हेल्थ टिप्स नक्की वाचा.

Monsoon Health Tips: पावसाळ्यात आजारी पडायचं नसेल तर या 7 गोष्टींपासून राहा दूर, डॉ मिगलानींनी दिला 'हा' इशारा
"Monsoon Health Tips: पावसाळ्यात काय खावे आणि काय खाणे टाळावे?"
Gemini AI प्रतिकात्मक फोटो

Monsoon Health Tips: पावसाळा ऋतुमुळे भीषण उकाड्यापासून दिलासा मिळतो. पण या काळात संसर्ग, अन्नातून विषबाधा आणि पोटाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता जास्त असल्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशींचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळेच डॉक्टर या ऋतूमध्ये खाण्यापिण्याबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला देतात. तज्ज्ञांच्या मते योग्य आहाराचे सेवन केल्यास संसर्गाचा धोका कमी होण्यासह शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही मजबूत होण्यास मदत मिळते.

एशियन हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे संचालक आणि एचओडी, डॉक्टर अमित मिगलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पावसाळ्यात शरीराला अशा खाद्यपदार्थांची गरज असते, जे सहज पचतील आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती निरोगी ठेवण्यास मदत मिळेल. या ऋतूत बाहेरचे, उघड्यावरचे आणि शिळे अन्न खाणे टाळावे, कारण त्यामुळे अन्नातून संसर्ग होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो."

पावसाळ्यात या 7 गोष्टी अवश्य खा:

1. हंगामी फळे: सफरचंद, डाळिंब, पिअर, पपई आणि पेरू यासारख्या फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा चांगला साठा असतो.

2. आले आणि लसूण: आले आणि लसणामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी (दाहक-विरोधी) गुणधर्म आढळतात. आले-लसणाचा रोजच्या जेवणात समावेश केल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल. 

3. हळद: हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि संसर्गाविरोधात लढण्यासाठी उपयुक्त मानले जाते. डाळ, भाजीमध्ये हळदीचा आवर्जून समावेश करावा आणि हळदीचे दूधही प्यावे. 

4. प्रोटीनयुक्त आहार: मूग डाळ, मसूर डाळ, पनीर, अंडी, दही आणि मोड आलेली कडधान्ये यासारखे प्रोटीनयुक्त स्रोत शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

5. व्हिटॅमिन-सी युक्त पदार्थ: आवळा, लिंबू, पेरू आणि शिमला मिरची यासारखे पदार्थ शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

6. गरम सूप आणि हर्बल पेये: गरम सूप, लिंबू पाणी आणि आले-तुळस चहा यासारखी हर्बल पेये शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासोबतच या ऋतूत होणारी अस्वस्थता कमी करण्यास मदत करतात.

7. पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी: पावसाळ्यात तहान कमी लागते पण शरीराला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या.

(नक्की वाचा: Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेने त्रस्त? शाकाहारींसाठी वरदान ठरेल फक्त 'ही' 1 गोष्ट)

पावसाळ्यात या गोष्टींपासून दूर राहा:

डॉक्टरांच्या मते, पावसाळ्यात काही खाद्यपदार्थ संसर्गाचा धोका वाढवू शकतात. कोणकोणत्या गोष्टींपासून दूर राहावे, जाणून घ्या सविस्तर माहिती...

  • रस्त्याच्या कडेला मिळणारे उघडे अन्नपदार्थ.
  • शिळे किंवा अनेक तास आधी बनवलेले जेवण.
  • जास्त वेळ उघड्यावर ठेवलेली कापलेली फळे आणि सॅलड.
  • अर्धे शिजवलेले मांस, मासे आणि अंडी.
  • अस्वच्छ पाण्यापासून तयार केलेला बर्फ आणि पेये.
  • अति तळलेले, भाजलेले आणि मसालेदार पदार्थ.
  • न धुता खाल्लेली फळे आणि भाज्या.

डॉ. मिगलानी यांनी सांगितले की, "पावसाळ्यात पचनसंस्था थोडी संवेदनशील असू शकते. त्यामुळे पचनास हलके, ताजे आणि घरगुती जेवण हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. जेवण तयार करण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्यासोबतच किचनच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे."

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या सवयी लावा:

तज्ज्ञांच्या मते, केवळ पौष्टिक आहार पुरेसा नाही. पुरेशी झोप, नियमित शारीरिक हालचाल, तणावावर नियंत्रण आणि पुरेसे पाणी पिणे या गोष्टी देखील रोगप्रतिकारशक्तीसाठी आवश्यक आहेत. याशिवाय ताजे अन्न सेवन करा आणि अन्न जास्त काळ सामान्य तापमानात ठेवू नका.

(नक्की वाचा: Morning Routine Tips: रात्री 8 तास झोपूनही सकाळी थकवा जाणवतो? सकाळी उठल्यानंतर 3 कामं करा, दिवसभर वाटेल फ्रेश)

डॉक्टरांचा सल्ला:

डॉ. अमित मिगलानी यांनी सांगितले की, "पावसाळ्यात आरोग्याशी संबंधित केलेला छोटासा निष्काळजीपणा देखील पोटाचा संसर्ग, उलट्या-जुलाब आणि विषाणूजन्य आजारांना कारणीभूत ठरू शकतो. जर सतत पोटदुखी, उलट्या, जुलाब किंवा तीव्र ताप यासारख्या समस्या जाणवत असतील तर घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य आहार आणि स्वच्छ खाणेपिणे हाच या ऋतूत निरोगी राहण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे."

तज्ज्ञांचे मत आहे की, पावसाळ्यात संतुलित आणि स्वच्छ आहार घेऊन संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. जर खाण्यापिण्यासोबत स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीकडेही लक्ष दिले तर संपूर्ण पावसाळ्यात शरीर निरोगी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहू शकते.

डॉ. अमित मिगलानी यांना गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, हेपॅटोलॉजी आणि थेरप्यूटिक एन्डोस्कोपीच्या क्षेत्रात 18 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com