Pausha Putrada Ekadashi 2025 Vrat Remedies: सनातन परंपरेनुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी अतिशय महत्त्वाची मानली जाते. नावावरुनच स्पष्ट होते की या तिथीचे व्रत पुत्र किंवा अपत्याशी संबंधित आहे. पुत्रदा स्मार्त एकादशीचे व्रत केल्यास अपत्यप्राप्ती होते, असे मानले जाते. तसेच पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास आपल्या मुलांचे सुख आणि दीर्घायुष्य वाढते,असेही म्हणतात. पुत्रदा एकादशीच्या व्रताचे (Pausha Putrada Ekadashi 2025) योग्य पद्धतीने पालन केल्यास भाविकांच्या जीवनातील पाप-दोष दूर होण्यास मदत मिळू शकते आणि अश्वमेध यज्ञासारखेच पुण्यफळ प्राप्त होईल, असेही म्हणतात. या व्रताशी संबंधित सोप्या आणि प्रभावी उपासनेच्या पद्धतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
पौष महिन्यातील पुत्रदा एकादशीला करा हे महाउपाय | Pausha Putrada Ekadashi 2025 Vrat Upay In Marathi

1. गंगा स्नानास महत्त्व
हिंदू मान्यतेनुसार, भगवान विष्णुंना समर्पित असणाऱ्या एकादशी व्रताच्या दिवशी गंगा स्नान करण्यास अतिशय महत्त्व आहे. एकादशी तिथीच्या दिवशी भाविकाने माता गंगा यासारख्या पवित्र जलस्त्रोतामध्ये स्नान केल्यास तन-मन पवित्र होते आणि भगवान हरींची पूजा केली तर त्याची आध्यात्मिक साधना लवकर यशस्वी होते तसेच गंगेत स्नान केल्याने सर्व पाप नष्ट होतात, असेही म्हणतात.

2. मंत्राने पूर्ण होईल इच्छा
हिंदू धर्मामध्ये कोणत्याही देवतेच्या किंवा देवीच्या पूजेमध्ये मंत्रांचा जप करण्यास अतिशय महत्त्वाचे मानले जाते. एकादशीचा उपवास यशस्वी करायचा असेल आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर व्रताच्या दिवशी भगवान विष्णूंच्या 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा विशेष जप करावा. पिवळ्या रंगाची चंदनाची किंवा तुळशीच्या माळेने मंत्र जप करावा आणि आसन देखील पिवळ्या रंगाचेच असावे.
(नक्की वाचा: Paush Putrada Ekadashi 2025 Date: पुत्रदा स्मार्त एकादशी कधी आहे, 30 की 31 डिसेंबर? योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या)

3. दिव्याने दूर होतील दुःख
हिंदू मान्यतेनुसार, एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि विष्णूंना प्रिय असणाऱ्या तुळशीच्या रोपासमोर शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. हा उपाय केल्यास जीवनातील सर्व दुःख दूर होतील आणि सुख-समृद्धीचा वर्षाव होईल. एकादशीच्या दिवशी श्री हरी आणि तुलसी मातेसाठी गाईच्या दुधानेच तयार केलेल्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा तसेच तुळशी वृदांवनाभोवती कमीत कमी 11 वेळा प्रदक्षिणा घालावी.

एकादशीच्या व्रतादिवशी पूजेमध्ये श्री हरींचा शंखातील जलाने अभिषेक करण्याचे अतिशय महत्त्व आहे. मान्यतेनुसार पूजेमध्ये हा उपाय केल्यास केवळ भगवान विष्णूच नव्हे तर लक्ष्मीमातेचीही कृपा होईल. हा उपाय केल्यास लक्ष्मीमाता प्रसन्न होऊन आपल्या भक्ताच्या घरामध्ये कायमचे निवास करते, असेही म्हणतात.

हिंदू मान्यतेनुसार व्रत आणि सणांदरम्यान दानधर्म करणं फलदायी मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्रतासंबंधित किंवा विशिष्ट देवतेला प्रिय असलेल्या वस्तू गरजूंना दान केल्यास त्यांची आध्यात्मिक साधना लवकरच यशस्वी होते. पुत्रदा एकादशीच्या दिवशी भाविकाने एखाद्या मंदिराच्या पुजाऱ्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र, पिवळ्या रंगाची फळं, चण्याची डाळ इत्यादी गोष्टी दान करणं लाभदायी ठरते. एकादशीच्या दिवशी गाईला चारा इत्यादी गोष्टी दान करण्याचेही मोठे महत्त्व आहे.

एकादशी व्रताच्या दिवशी अन्न आणि तामसिक पदार्थांचे सेवन करू नये. या दिवशी गाईचे दूध, फळे, मखाने, कुट्टचे पीठ एकूणच व्रताच्या पदार्थांचे सेवन करावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world