- चहा जास्त वेळ उकळल्यास त्यातील आम्लधर्मीय गुणधर्म वाढून तो अधिक ॲसिडिक होतो आणि आरोग्यासाठी धोकादायक ठरतो
- कमी पीएच असलेला चहा पोटातील नैसर्गिक ॲसिडची पातळी वाढवून ॲसिड रिफ्लक्स आणि पचनतंत्र विकार निर्माण करू शकतो
- जेवणानंतर लगेच चहा प्यायल्यास अन्नातील लोह शोषणावर परिणाम होऊन दीर्घकाळात ॲनिमियासारख्या समस्या उद्भवू शकतात
भारतीयांच्या जीवनात चहाचे स्थान अढळ आहे. मात्र चहा बनवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. अनेक जण चहा कडक करण्याच्या नादात तो जास्त वेळ उकळवतात. चहा जास्त वेळ उकळल्याने त्यातील आम्लधर्मीय (Acidic) गुणधर्म वाढतात. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आशु घई यांनी एका प्रयोगाद्वारे हे सिद्ध केले आहे. जास्त वेळ उकळलेल्या चहाची पीएच पातळी लक्षणीयरीत्या कमी होते, ज्यामुळे तो अधिक ॲसिडिक बनतो. ते आपल्या आरोग्यालाही धोकादायक ठरतात.
कमी पीएच असलेला चहा प्यायल्याने पोटातील नैसर्गिक ॲसिडची पातळी वाढते. यामुळे ॲसिड रिफ्लक्स, छातीत जळजळ आणि अस्वस्थता जाणवू शकते. विशेषतः रिकाम्या पोटी असा चहा घेतल्यास पचनसंस्थेचे विकार बळावण्याची शक्यता असते. चहामधील घटकांमुळे शरीरातील लोह (Iron) शोषण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. जेवणानंतर लगेच चहा घेण्याच्या सवयीमुळे अन्नातील पोषक तत्वे शरीराला मिळत नाहीत, ज्याचे रूपांतर दीर्घकाळात ॲनिमियासारख्या समस्यांमध्ये होऊ शकते.
नक्की वाचा - चहा सोबत काय खावू नये? 'हे' पदार्थ खाणे टाळा नाही तर अनेक समस्यांचे व्हाल शिकार
आरोग्यावर होणारे विविध परिणाम
- पचन: संवेदनशील पोट असलेल्या व्यक्तींना यामुळे छातीत जळजळ आणि पोटात गॅस होण्याचा त्रास होतो.
- दंत आरोग्य: अति आम्लयुक्त पेयामुळे दातांचे संरक्षण कवच कमकुवत होण्याची भीती असते.
- डिहायड्रेशन: चहामधील कॅफीनमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहाची चव वाढवण्यासाठी तो खूप वेळ उकळणे टाळावे. लोह कमी पडू नये म्हणून जेवण आणि चहा यामध्ये किमान 1 तासाचे अंतर ठेवणे हिताचे ठरते. चहाचे सेवन मर्यादित ठेवल्यास त्याचे दुष्परिणाम टाळता येतात. त्यामुळे चहाबाबत असलेले समज आणि गैरसमज आधी समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. नाही तर त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होवू शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world