- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
- अपघातानंतर विमानाचे दोन भाग झाले
- भीषण अपघातात मृतदेहांची ओळख पटवणे कठीण होते
Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (28 जानेवारी 2026) सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबई विमानतळावरून उड्डाण केले होते. बारामतीपासून केवळ 20 किलोमीटर अंतरावर असताना सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. हा अपघात बारामतीजवळील गोजुबावी गावाजवळ झाला, जेथे विमान जमिनीवर आदळले. जमिनीवर आदळताच विमानाचे दोन तुकडे झाले आणि विमानाने पेट घेतला. विमानात असलेल्या पाचही जणांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की विमानातील मृतदेह ओळखणे कठीण झाले होते. अजित पवार यांचा मृतदेहही ओळखता येत नव्हता.
मनगटावरील घड्याळामुळे अजित पवारांची ओळख
सूत्रांच्या माहितीनुसार, अपघातस्थळी पोहोचलेल्या पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मृतदेहांची ओळख पटवणे कठीण जात होते. मृतदेह पूर्णपणे जळले होते. अशा परिस्थितीत अजित पवार यांची ओळख त्यांच्या मनगटावर बांधलेल्या घड्याळामुळे पटली. घटनास्थळी विमानाचे भाग तसेच काही कागदपत्रे विखुरलेली होती. आज (28 जानेवारी 2026) अजित पवार बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जाहीर सभेला संबोधित करणार होते, पण सकाळी सुमारे 8 वाजून 46 मिनिटांनी हा दुर्दैवी अपघात झाला. राज्यात जिल्हा परिषद निवडणुका 5 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. अजित पवार यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह घड्याळ आहे. निधनानंतरही त्यांची ओळख त्यांच्या मनगटावरील घड्याळामुळेच पटली. हा दुर्दैवी योगायोगच म्हणावा लागेल.
(नक्की वाचा: Ajit Pawar Passes Away: विमान कोसळल्यानंतर पुन्हा 4-5 स्फोट झाले, अजित पवारांच्या अपघातात प्रत्यक्षदर्शीने सर्वच सांगितलं)
राज्यात तीन दिवसांचा दुखवटा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला आहे. प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की, सरकारच्या निर्देशानुसार 28 जानेवारी ते 30 जानेवारीदरम्यान राजकीय शोक पाळला जाईल आणि या कालावधीत ज्या-ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणला जाईल.