School Time: महाराष्ट्रात 'अल निनो'च्या जागतिक हवामान प्रभावामुळे यंदा मान्सून चांगलाच लांबला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाड्यातील बीड आणि लातूर जिल्ह्यांत तापमानाचा पारा वाढला असून उन्हाची तीव्रता कायम आहे. या वाढत्या उष्णतेमुळे शालेय विद्यार्थ्यांना उष्माघात आणि डिहायड्रेशन सारख्या त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. मंगळवार, 23 जूनपासून पुढील आदेश येईपर्यंत या दोन्ही जिल्ह्यांतील शाळा आता दुपारऐवजी सकाळच्या सत्रात भरवल्या जाणार आहेत.
बीड जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व शाळांना निर्देश
बीड जिल्ह्यामध्ये भौगोलिक परिस्थितीमुळे दरवर्षीच कमी पाऊस होतो. यंदा त्यात अल निनोच्या संकटामुळे भर पडली आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने तात्काळ आदेश जारी केले आहेत.
(नक्की वाचा- Pune News: पाणीटंचाईमुळे पाण्याचे दुर्भिक्ष! त्यात नवी अडचण, पुणेकरांचं टेन्शन वाढलं)
जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद आणि इतर व्यवस्थापनांच्या शाळा 23 जूनपासून सकाळी भरतील. सकाळी 8 ते दुपारी 12.30 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. बीडच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
(नक्की वाचा- Monsoon Update: मुंबईकरांनो छत्री-रेनकोट तयार ठेवा, अखेर मान्सून धडकणार! हवामान विभागाची मोठी अपडेट)
आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई
लातूर जिल्ह्यातही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विशेष अधिकारांचा वापर केला आहे. या कायद्यांतर्गत खबरदारीचा उपाय म्हणून लातूर जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची वेळ बदलण्यात आली आहे. लातूरमध्येही शाळांची वेळ सकाळी 8 ते दुपारी 12.30 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.