आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed News : महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून समोर येत असतात. आजही विवाहितेला हुंड्यासाठी जीव द्यावा लागतो. धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील अनेक उच्चभ्रू घरांमध्ये लग्नानंतर महिलेवर हुंड्यासाठी अनन्वित अत्याचार केला जातो. बीडमध्ये घडलेल्या अशाच घटनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई न्यायालयातून एक महिलेच्या खून प्रकरणी मोठा निकाल समोर आला आहे. बीडमध्ये या महिलेला अखेर न्याय मिळाल्यामुळे दिलासा व्यक्त केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करत तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सासू-सासऱ्यांना सोडण्यात आलं नाही तर सासू-सासऱ्यांनाही दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तब्बल ६ वर्षानंतर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
परळी तालुक्यातील आचार्य टाकळी येथील मनीषा आचार्य हिचा 4 ऑगस्ट 2020 च्या रात्री पती जगन्नाथ आचार्यने कुऱ्हाडीच्या दांड्याने प्रहार करून खून केल्याचं तपासात उघड झालं होतं. या घटनेनंतर आत्महत्येचा बनाव करण्याचाही प्रयत्न झाला होता. मात्र पोलीस तपास आणि वैद्यकीय अहवालातून सत्य समोर आलं. मुलीला न्याय मिळावा म्हणून वडील मनोहर काळे यांनी सर्व प्रलोभने नाकारत न्यायालयीन लढा अखेरपर्यंत लढला आणि आता न्यायालयानेही आरोपींना कठोर शिक्षा सुनावत ठोस संदेश दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world