जाहिरात

Beed: परीक्षा केंद्र की लग्नाचा मांडव? 10वीच्या विद्यार्थ्यांचा पेपर रणरणत्या मंडपात, बीडमधील संतापजनक प्रकार

Beed News: बीड जिल्ह्यातील कुर्ला परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चक्क मंडपात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाढत्या उन्हात विद्यार्थ्यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार असल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे.

Beed: परीक्षा केंद्र की लग्नाचा मांडव? 10वीच्या विद्यार्थ्यांचा पेपर रणरणत्या मंडपात, बीडमधील संतापजनक प्रकार
"Beed News: बीडमध्ये दहावीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ"
NDTV Marathi

- आकाश सावंत, प्रतिनिधी

Beed News: राज्यात इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरू झालीय. यादरम्यान बीड जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागाचा एक धक्कादायक आणि सावळा गोंधळ समोर आला आहे. बीड तालुक्यातील कुर्ला येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना चक्क मंडपात बसून पेपर द्यावा लागणार आहे. वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना आता या मंडपातील उकाड्यात बसून दहावीची अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. या प्रकारावर पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बीडमधील कुर्ला येथे नेमके काय घडलं?  

बीड जिल्ह्यातील कुर्ला येथे दहावीचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. पण या केंद्रावर उपलब्ध असलेल्या खोल्यांच्या तुलनेत परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगितलं जातंय. या वाढीव संख्येला सामावून घेण्यासाठी प्रशासनाने खोल्यांची पर्यायी व्यवस्था करण्याऐवजी चक्क शाळेच्या मैदानात कापडी मंडप उभारलं. या मंडपातच बाकडे टाकून विद्यार्थ्यांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

(नक्की वाचा: Nanded News: जिद्दीला सलाम! बाळंतपणानंतर अवघ्या 2 दिवसांत पेपर; नांदेडच्या शीतलने 10 दिवसांच्या बाळाला घेऊन दिली 12वीची परीक्षा)

वाढता उकाडा अन् विद्यार्थ्यांचे हाल

फेब्रुवारी महिना संपत आला असून मार्चच्या सुरुवातीलाच बीडमध्ये उन्हाचा पारा चढू लागला आहे. अशा रणरणत्या उन्हात कापडी मंडपाखाली बसून तीन तास पेपर लिहिणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत कठीण जाणार आहे. उकाड्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, एखादा विद्यार्थी उष्माघातामुळे आजारी पडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

(नक्की वाचा: SSC Exam 2026 Wishes: टेन्शन विसरा आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा;10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेनिमित्त पाठवा शुभेच्छा)

प्रशासनाचा दावा आणि सावळा गोंधळ

बारावीची परीक्षा झाल्यानंतर दहावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याचा दावा प्रशासन करत आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र कुर्ला केंद्रावर पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांसाठी योग्य व्यवस्था का करण्यात आली नाही? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com