
BMC Election 2025: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका रखडल्या असून त्या पुढील वर्षी 31 जानेवारीच्या आत घेण्यात याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे यंदाच्या दिवाळीनंतर निवडणुकांच्या प्रचाराचा धूमधडाका सुरू होईल अशी अपेक्षा आहे. यंदाच्या निवडणुकीपूर्वी सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का ? याचे उत्तर मिळाले असून या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचे निश्चित केले आहे. ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र निवनिर्माण सेना या दोन पक्षांनी किती जागा लढवाव्यात यासाठीचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या युतीची घोषणा दसरा मेळाव्यात होणार नसून दिवाळीच्या मुहुर्तावर ती होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा: मनसेला जबर हादरा! बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरेंचा आदेश
मराठी बहुल मतदारसंघांसाठी वेगळा फॉर्म्युला
मुंबई महापालिकेचे एकूण 227 वॉर्ड असून महापालिकेवर गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. सत्ता अबाधित राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांचा पक्ष प्रयत्नशील असून त्यांनी यासाठी आपल्या चुलत भावाची म्हणजेच राज ठाकरे यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. मराठीच्या मुद्दावर हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते. आता निवडणुकीसाठीही हे दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याचे निश्चित झाले असून दोन्ही पक्षांनी मुंबईत किती जागा लढवाव्यात हे देखील निश्चित झाल्याचे वृत्त PTI ने दिले आहे. या वृत्तानुसार ज्या मतदारसंघांमध्ये मराठीजनांचा प्रभाव अधिक आहे त्या मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांना समसमान जागा मिळणार आहेत. या मतदारसंघांमध्ये दादर-माहिम, लालबाग-परळ-शिवडी, विक्रोळी, दिंडोशी, घाटकोपर पश्चिम, दहिसर आणि भांडुप यासारख्या मतदारसंघांचा समावेश आहे. मराठी बहुल मतदारसंघांशिवाय अन्य मतदारसंघात मात्र जागा वाटप वेगळ्या पद्धतीने असेल.
उर्वरीत मुंबईत कोण किती जागा लढणार ?
मराठी बहुल भाग वगळता मुंबईच्या उर्वरित मतदारसंघांसाठीचा फॉर्म्युला वेगळा असणार आहे. या मतदारसंघांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जास्त जागांवर लढणार आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार या मतदारसंघांमध्ये ठाकरेंची शिवसेना 60 टक्के जागा लढेल तर मनसे 40 टक्के जागांवर आपले उमेदवार उभे करेल. हे दोन्ही फॉर्म्युला मिळून ठाकरेंची शिवसेना 227 मतदारसंघांपैकी 147 वॉर्डांमध्ये आपले उमेदवार उभे करेल तर राज ठाकरेंची मनसे 80 जागांवर निवडणूक लढवेल. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या स्थानिक कार्यकर्त्यांना संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हे जागावाटप केवळ आकड्यांचे नाही, तर दोन्ही पक्षांच्या ताकद आणि प्रभावाचा विचार करून केले आहे असे सांगण्यात आले आहे.
नक्की वाचा: ‘दोन शून्यां'ची बेरीज शून्यच...", बेस्ट निवडणुतील पराभवानंतर ठाकरे बंधुंवर भाजपचा हल्लाबोल
मुस्लिमबहुल मतदारसंघांसाठी वेगळी भूमिका
राज ठाकरे यांच्या मनसेने कायमच मराठी अस्मितेवर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर दिला आहे. गेल्या काही वर्षांत मनसेने आणि राज ठाकरेंनी आपली ओळख कट्टर हिंदुत्ववादी अशी निर्माण केली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर मुस्लिमबहुल वॉर्डांमधील बहुतांश जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लढवणार असल्याचे समजतंय. मनसेचा प्रभाव असलेल्या माहिम मतदारसंघातील दोन मुस्लिमबहुल वॉर्ड तसेच भायखळा आणि जोगेश्वरीचा यामध्ये समावेश आहे. असे केल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आपली सर्वसमावेशक छबी जपण्यात मदत होईल, तर मनसेलाही आपल्या मतदारांना न दुखावता मते मिळवता येतील.
राज ठाकरेंचा काँग्रेससोबत जाण्यास नकार
ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंची मनसे मविआमध्ये जाणार का उद्धव ठाकरेंची शिवसेना(उबाठा) महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असा प्रश्न विचारला जात होता. मनसेच्या एका नेत्याने पीटीआयशी बोलताना म्हटले की राज ठाकरे कोणत्याही स्थितीत काँग्रेससोबत जाणार नाहीत. दुसरीकडे काँग्रेसनेही राज ठाकरेंच्या मनसेसोबत आपण जुळवून घेणार नाही असे जाहीर केले आहे. यामुळे उद्धव ठाकरेंची सेना मविआतून बाहेर पडून नवी युती करताना दिसेल हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पदरी निराशा
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेची कामगिरी निराशाजनक होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 95 जागांवर लढली होती, मात्र त्यांना केवळ 20 जागांवर विजयी मिळाला होता. शिवसेनेच्या 30 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात खराब कामगिरी होती. दुसरीकडे, मनसेला एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यामुळे, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपली ताकद टिकवण्यासाठी आणि नव्याने सिद्ध करण्यासाठी या दोन्ही पक्षांना एकत्र येणे अपरिहार्य झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे
बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू राहिली आहे. 74,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट असलेली ही महापालिका देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था मानली जाते. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अविभाजित शिवसेनेने या महापालिकेवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले होते. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले, तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हणून ओळख मिळाली. या ऐतिहासिक फुटीनंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक असणार आहे. 2022 पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 January 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world