
Maharashtra Budget Session 2025: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. आज विधानसभेच्या कामकाजादरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस नेते नाना पटोले, जयंत पाटील यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा खरचं झालाय का? असा महत्त्वाचा सवाल करत सभागृहात गोंधळ घातला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. वाल्मिक कराडच्या टोळीने अत्यंत निर्दयीपणी सरपंच देशमुख यांची हत्या केली. या हत्येच्या घटनेनंतर जनतेचा उद्रेक वाढला आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी विधानसभेत मोठा गदारोळ करत सरकारला सवाल विचारला आहे.
"राज्याच्या एका मंत्रिमहोदयाचा राजीनामा झाला आहे, असं आम्ही ऐकतोय. मात्र अजूनपर्यंत सभागृहामध्ये सरकारच्या वतीने काहीही अवगत केलेले नाही, बाहेर फक्त घोषणा झालीय. प्रथा आणि परंपरा या नेहमी आपण सर्वांनी पाळलेल्या आहेत. हा सभागृहाचा अवमान आहे. धनंजय मुंडेचा राजीनामा खरचं झालाय का? हे आम्हाला सभागृहात अवगत केली पाहिजे, ही आमची मागणी आहे.." असं नाना पटोले म्हणाले.
(नक्की वाचा- Exclusive : संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर, मन सून्न करणारी माहिती समोर)
"आपल्याला तालिकेवर बसलेले अधिकारी चुकीची माहिती देत आहेत. सभागृहातील मंत्र्यांचा राजीनामा बाहेर झाला, मात्र त्याची माहिती सभागृहात देण्याची आवश्यकता आहे ती दिलेली नाही. मुख्यमंत्री बाहेर जाऊन सांगतात, त्यांचा राजीनामा झाला आहे. मात्र ते इथं सांगायला पाहिजे होतं, अशा प्रकारांनी सभागृहाचा अवमान झाला आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, अशी सभागृहाची प्रथा नाही, तरीही आम्ही तपासून त्याबाबतची माहिती देऊ," असे संजय केळकर यांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world