Chhatrapati Sambhajinagar : मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात गर्भपात करणारं रॅकेट सक्रिय असल्याचं सतत समोर येत आहे. आधी जालना आणि आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एकामागून एक होणाऱ्या कारवाईमुळे गर्भपात करणाऱ्या टोळ्या वाढतच असल्याचे दिसत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरात देखील असाच काही प्रकार समोर आला आहे. जिथे जीव वाचवण्याचे धडे दिले जातात, त्याच वैद्यकीय क्षेत्रातील पांढऱ्या वेशातील सख्ख्या बहिणींनी कोवळ्या कळ्यांना गर्भातच खुडण्याचा अघोरी व्यवसाय मांडला होता.
नेमकं काय आहे हे प्रकरण?
वर्षा जाधव आणि उर्मिला गायकवाड या दोन्ही सख्ख्या बहिणी, पेशाने परिचारिका आहेत. पण त्यांनी आपल्या पेशाचा वापर जीव वाचवण्यासाठी नाही, तर कोवळ्या जीवांचा बळी घेण्यासाठी केला आहे. 15 हजार रुपयांत एका पोर्टेबल मशीनच्या साहाय्याने लिंग तपासणी आणि त्यानंतर गर्भपातासाठी लाखो रुपयांची मागणी केली जात होती. पैशांच्या हव्यासापोटी या दोघींनी आपल्या स्त्रीत्वाचाही विचार केला नाही. पण महापालिकेचा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे टाकलेल्या या धाडीमुळे साताऱ्यातील हा भ्रूणहत्येचा अड्डा उद्ध्वस्त झाला आहे.
सातारा पोलिसांना आपल्या हद्दीत अवैध गर्भपात होत असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले यांनी पुरावे गोळा करून छापा मारण्याचं नियोजन केलं. ही गुप्त माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. पारस मंडालेचा यांना दिली आणि त्यानंतर छापा टाकला. यात ज्योती पवार ही महिला रुग्णांना घेऊन यायची. त्यानंतर गोळ्या देऊन गर्भपात केला जायचा. पोलिसांच्या कारवाईत गर्भपाताच्या गोळ्यांची 11 पाकिटं सापडली आहेत. त्यामध्ये काही गोळ्यांचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे सिल्लोड तालुक्यात लिंग तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये स्त्रीभ्रूण असल्याचे निष्पन्न झालं. त्यानंतर ही महिला येथे दाखल झाली होती.
अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात कधी थांबणार?
या रॅकेटमध्ये सहभागी सगळ्यांच्या वेगवेगळ्या भूमिका असायच्या. एजंटने लोक शोधायचे, विश्वास संपादन करत अंदाजे खर्च सांगून ग्राहक गाठायचा. दुसऱ्याने घरी जाऊन पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून सोनोग्राफी करायची. पोटातील भ्रूण मुलगी आहे की मुलगा ते सांगायचं. मुलगी असल्यास गर्भपात करण्यासाठी मोठी रक्कम सांगितली जायची. ग्रामीण भागातील लोकांना गर्भपात करण्यासाठी शहरात बोलावलं जायचं. विशेष म्हणजे गर्भपात करण्यासाठी नेहमी वेगवेगळ्या जागांची निवड केली जात होती. गर्भपात करण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका ज्योती पवारची असायची.
या संपूर्ण रॅकेटमध्ये केवळ डॉक्टर किंवा परिचारिकाच दोषी नाहीत. तर पोटातील निष्पाप जीवाला संपवायला निघालेले नराधम आई बापही तितकेच तितकेच जबाबदार आहेत. आज एक रॅकेट उध्वस्त झालं, उद्याही कारवाई होत राहील. पण पैशाला चटावलेल्या आणि आईच्या उदरात खुलणाऱ्या कळ्या खुडण्याचं काम करणाऱ्या या गुन्हेगारी टोळ्या कधी संपणार? हा प्रश्न आहेच.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world