Chhatrapati Sambhajinagar ZP Election : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या विशेष समिती सभापती निवडीने जिल्ह्याच्या राजकारणात अभूतपूर्व कलाटणी दिली आहे. मैत्रीपूर्ण लढतीचा दावा करणाऱ्या महायुतीमध्ये भाजपाने असा काही राजकीय डाव टाकला की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेच्या उंबरठ्यावरून रिकाम्या हाताने माघार घ्यावी लागली. या निवडणुकीत केवळ शिंदे गटच नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही भाजपाने जोरदार शह दिला आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटात उघडपणे दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय होती भाजपाची खेळी?
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासूनच भाजपाने आपली आक्रमक रणनीती स्पष्ट केली होती. शिवसेनेला सत्तेत वाटा देण्याऐवजी भाजपने थेट अजित पवार गटाशी हातमिळवणी करत आपले वर्चस्व सिद्ध केले. सभापती निवडणुकीतही भाजपने तोच पॅटर्न राबवला.

भाजपाने केलेल्या या तटबंदीमुळे शिंदे गटाची अशी काही कोंडी झाली की, पराभवाच्या धास्तीने त्यांना आपला उमेदवारच रिंगणात उतरवता आला नाही. दुसरीकडे, ठाकरे गटाचे काही सदस्य भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती, त्यामुळे ठाकरे गटाने मतदान न करता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.
(नक्की वाचा : Chhatrapati Sambhajinagar : स्वस्त गोरेपणाच्या नादात आयुष्य पणाला; पाकिस्तानी उत्पादनांचा संभाजीनगरमध्ये धुमाकूळ )
ठाकरे गटातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर
भाजपा बाहेरून वार करत असताना, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अंतर्गत वादाचा मोठा फटका बसला आहे. जिल्हा परिषद सदस्य कृष्णा डोणगावकर यांनी थेट विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर गंभीर निशाणा साधला आहे. पक्ष एकीकडे आणि दानवे दुसरीकडे, असा खळबळजनक आरोप डोणगावकर यांनी केला.

हे आरोप केवळ राजकीय मर्यादेत राहिले नाहीत, तर ते वैयक्तिक आणि अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा दावा डोणगावकर यांनी केला असून, कर्जतमध्ये अर्थपूर्ण बैठका झाल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे.
( नक्की वाचा : Pune Rain: पुण्यात एप्रिलमध्येच पावसाळा! मुसळधार पावसाने पुणेकरांची उडवली दैना, वाहने पाण्यात तरंगली )
बदललेली राजकीय गणिते
जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीने मित्र आणि शत्रू यांची जुनी गणिते पूर्णपणे पुसून टाकली आहेत. भाजपने आपली ताकद दाखवत शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवले, तर ठाकरे गटातील नेत्यांच्या आपापसातील वादाने विरोधकांचे काम सोपे केले. दोन्ही शिवसेनेने सत्तेचे गणित जुळवण्यासाठी भाजपवर जो राजकीय फास टाकण्याचा प्रयत्न केला होता, तोच फास भाजपने त्यांच्यावर उलटवला. परिणामी, अध्यक्षपद तर सोडाच, पण एक सभापतीपदही दोन्ही शिवसेनेला मिळवता आले नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world