जाहिरात

Dharavi Project: धारावीचा विकास, सुंदर कमला नगरची अस्वस्थता

पक्की घरांच्या नावाखाली इथं अनेकदा सर्व्हे झाले. लोकांच्या घरांवर नंबर पडले. पण पुढे काहीच घडलं नाही. आम्ही आजही या पक्क्या घरांच्या प्रतिक्षेत आहोत."

Dharavi Project: धारावीचा विकास, सुंदर कमला नगरची अस्वस्थता

नरेंद्र बंडबे, मुंबई: बीएमसी 650, सुंदर कमला नगर,  हा आमचा पत्ता होता. सहा बाय आठ फुटांची म्हणजे 48 चौरस फुटांची खोली. मी इथंच लहानाचा मोठा झालो. सुंदर कमला नगर किंग्ज़ सर्कल रेल्वे स्टेशन शेजारी पसरलेली झोपड़पट्टी. जवळपास 10 एकर जागेवर वसलेली. माझ्या वडिलांनी 1975 च्या आसपास 300 रुपयांना इथं जागा घेतली. त्यावर ही खोली बांधली. वडिल कामाच्या शोधात रत्नागिरीहून मुंबईला आले होते. चिंचपोकळीला एका वर्कशॉपमध्ये काम मिळालं. काही वर्ष एकटेच राहिले. अंतर कुटूंबाला आणलं. तेव्हा ही झोपडी त्यांनी बांधली. आम्ही पाच भावंडं आणि आई-बाबा असे सात जण इथं राहायचो. तेव्हा सुंदर कमला नगर गटारावर बसलेली वस्ती होती. रेल्वे लाईनच्या शेजारीची. आधी प्लास्टिकची शेड, नंतर पत्रा आणि त्यानंतर हळू हळू विटांच्या भिंती उभ्या राहिल्या.

नक्की वाचा - Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागातील पाणीपुरवठा 11 तास बंद !

जस जशी झोपडपट्टी वाढायला लागली तसतसं लोक संघटीत व्हायला लागले. मंडळ स्थापन झाली. आम्ही जिथं राहायचो ते तरुण मित्र मंडळ. जवळपास १४० झोपड्यांचं. हे मंडळ झोपड्यांमध्ये नागरी सुविधा येण्यासाठी प्रयत्न करायचे. आधी किलोमीटर अंतरावर असलेल्या बीएमसीच्या नळांवरुन पाणी आणलं जायचं. हळू हळू झोपडपट्टीत सार्वजनिक नळ जोडणी, सार्वजनिक शौचालयं आली. आता प्रत्येक घरात स्वतंत्र नळ आहे. याचं सर्व नियोजन मंडळांचं. गणेशोत्सवापासून, गरबा आणि इतर सांस्कृतिक महोत्सव मंडळ साजरी करायचीत.

जमीन नक्की कुणाची, आमचं काय?

आमच्या शेजारी विठ्ठल भोस्तेकर राहायचे. एका डेकोरेटर्सच्या ऑफिसमध्ये काम करायचे. ते कित्येक वर्षे तरुण मित्र मंडळाचे सेक्रेटरी होते. तीन मुली आणि एक मुलासह ते सुंदर कमला नगरात राहायचे. इथल्या सामाजिक आणि राजकीय उपक्रमात सहभागी असायचे. त्यानी आपलं संपूर्ण आयुष्य इथं घालवलं. ते सांगतात, * आम्हाला माहित होतं की आमचा परिसर रेल्वेच्या अखत्यारीत येतो. रेल्वेने अनेकदा अतिक्रमण मोहित चालवली. आम्ही त्यातून बचावलो. वीज, पाणी, शौचालयं असं झोपडपट्टीसाठी आणलं. बीएमसीच्या निवडणुका आल्या की इथं पक्की घरं (रिडेव्हलपमेन्ट) बांधण्याची चर्चा व्हायची. गेली 50 वर्षे आम्ही इथं राहतोय. माझ्या सर्व मुलांची लग्न झाली. पक्की घरांच्या नावाखाली इथं अनेकदा सर्व्हे झाले. लोकांच्या घरांवर नंबर पडले. पण पुढे काहीच घडलं नाही. आम्ही आजही या पक्क्या घरांच्या प्रतिक्षेत आहोत."

विठ्ठल भोस्तेकर आजवर इथं झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली सुरु असलेल्या सावळ्या गोंधळाची गोष्ट सांगितली. ते पुढे म्हणाले," आम्ही आता धारावी डेव्हलपमेन्ट प्लान बद्दल ऐकलंय. धारावी झोपडपट्टी आमच्यापासून फक्त 800 मीटर अंतरावर आहे. आता तिथं खूप समस्या आहेत. पण कुणीतरी तिथं झोपडपट्टीचा विकासाचा विचार करतंय. हे सर्व पाहून सुंदर कमला नगरमध्ये राहणारे काहीसे अस्वस्थ झालेत. पक्क्या घरात राहणं प्रत्येकाचं स्वप्न आहे. पण ते स्वप्नच राहिल असं वाटायला लागलंय."

(नक्की वाचा-  Mumbai Water Metro : स्वस्त दरात मुंबईत 'वॉटर मेट्रो'चा पर्याय, 29 टर्मिनल उभारणार, 10 मार्गांची निवड)

हॉटस्पॉट तरीही उपेक्षित

झोपड़पट्टी असली तरी सुंदर कमला नगर हा हॉट स्पॉट झालाय. मला आठवतंय, आधी खूप लांबून पाणी आणायला लागायचं. मग बीएमसीकडून पाण्याची पाईपलाईन आली. 80 च्या दशकात शेवटी वीज आणि आणि पुढच्या दहा वर्षात इंथं प्रत्येक घरात नळजोडणी झाली. इथं राहणारे लोक रोजदारीवर काम करायचे. बहुतांश रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेले लोक इथं राहत. काही कुटूंब उत्तर प्रदेशातली, तर काही नेपाळची ही आहेत. बहुतांश लोक एकमेकांची नातेवाईक आहेत. एकाच गावातले किंवा एकाच भागातले इथे येऊन राहायला लागलेले. पुरुष मंडळी रौजदारी पासून ते कार्यालयांमध्ये काम करणारे, बहुतांश महिला या घरकाम करणाऱ्या, मांटुगा, अॅटॉप हिल परिसरात काम करणाऱ्या बहुतांश महिला याच भागातल्या आहेत.

विठ्ठल भोस्तेकर म्हणतात चांगल्या नागरी व्यवस्था मिळणं, सुंदर कमला नगरमध्ये राहणाऱ्यांचा हक्क आहे. त्यांना त्या मिळायलाच हव्यात. पण या भागाचा पुनर्विकास होण्यात खूप अडचणी आहेत. रेल्वे रुळाजवळची जागा रेल्वे प्रशासनाची आहे. सुंदर कमलानगरच्या बहुतांश भाग हा राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत. रेकॉर्डनुसार हा भाग हिरवा पट्टा, म्हणजेच ग्रीन झोन म्हणून घोषित आहेत.

"आम्हाला आजवर जमीन नक्की कुणाच्या मालकीची याची कल्पना आलेली नाही. पण आम्हाला विकास हवाय. तो कधी होणार हाच आमचा सवाल आहे. धारावीच्या झोपड्यांची घनता इथल्या पेक्षा जास्त आहे. तिथली झोपडपट्टीची बांधणी ही क्लिष्ट आहे. तिथं छोटे मोठे उद्योगधंदे पण चालतात. आमचा विभाग धारावी एव्हढा किचकट नाही. पण आम्ही जमीनचा मालकी हक्क कोणाचा या वादात अडकलोय. ना रेल्वे लक्ष देत ना सरकार. आता तर हे सर्व असंच राहिल आणि तीन पिढ्यांनी पाहिलेलं स्वप्न तसंच हवेत विरुन जाईल असं वाटतंय, गेल्या काही वर्षांमध्ये इथले अनेक मित्र मंडळं एकत्र आली. त्यांनी सरकारकडे प्रस्ताव ही पाठवले. पण नेहमी होतं तसं झालं. या लोकांमध्ये फूट पडली. वाद झाले. जे जसं आहे तसंच राहिलं. अनेकांची मुलं इथंच मोठी झाली. त्यांनी इथली घरं विकली. ते विरार, नवी मुंबई, कल्याण डोंबीवलीला बस्तान बसवल. आता इथे राहणाऱ्यांना नोंदीची समस्या भेडसावत आहे. 

Kashedi Ghat Tunnel: कशेडी घाटातील बोगद्याला गळती, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी कसरत

अजून किती दिवस वाट पाहायची?

विनोद दसवते, हा तरुण आमचा शेजारी. आता एका खासगी कंपनीत काम करतो. त्याने सांगितले, " आम्ही अगदी लहानपणापासून डेव्हलपमेन्ट होणार असं ऐकतोय. माझ्या आजोबांनी ही झोपडी घेतली होती. मी आणि माझी सर्व भावंडं इथंच जन्माला आली. प्रत्येक दोन वर्षांनी कुठली तरी स्किम येते याच्या वावड्या उठतात. मग सर्व्हे होतात. पण पुढे काहीच घडत नाही. गेली ३०-४० वर्षे हा असाच पॅटर्न आहे. आम्ही पक्क्या घराची वाट पाहतोय. आम्हाला मोठी घरं नकोयत. सुरक्षित आणि सुविधादायक असं घर मिळावं अशी माफक अपेक्षा आहे. पण प्रत्येक वेळी आम्हाला नवं आश्वासन मिळतं. चांगल्या घराचं स्वप्न तसंच राहतं."

या भागात राहणारी म्हातारी माणसं आता जास्त अस्वस्थ झालीयत. अख्क आयुष्य असं खडतर गेलंय. घरं आज तुटतील, उद्या तुटतील या भितीत. त्यांना धारावी डेव्हलपमेन्ट स्किमची बातमी जास्त अस्वस्थ करते. ज्यापध्दतीनं सरकार पुढाकार घेऊन तिथं योजना राबण्यासाठी ठाम दिसतंय, तिथं लवकरच पक्की घरं मिळतील, पण मग सुंदर कमला नगरचं काय होईल, याची चिंता त्याना लागलीय.

उदंड झाल्या योजना, पक्की घरं कधी मिळणार?

मुंबईतल्या झोपडीधारकांना आजवर अनेक योजनांनी भुल दिली. तात्कालिन काँग्रेस सरकारने १९७६ मध्ये झोपडपट्टी सुधारणा योजना आणली. पिण्याचं पाणी आणि सांडपाण्याचा निचरा हे या योजनेचं मुख्य उद्दीष्ट होते. मग 80 दशकाच्या शेवटाला झोपडपट्टी विकास योजना राबवली गेली. अपेक्षा वाढल्या पण प्रत्यक्षात काहीच घडलं नाही. शिवसेना-भाजप 1995 ला राज्यात सत्तेत आले. त्यांनी एसआरए योजना आणली. गेल्या ४०-५० वर्षांमध्ये सुंदर कमला नगर मधल्या लोकांनी अनेक स्थित्यंतरं पाहिली, अनुभवली. 1992 च्या दंगली अनुभवल्या. त्यानंतरचे बॉम्बस्फोट. इथं 60 टक्के हिंदू आणि 40 टक्के मुस्मिल लोकवस्ती आहे. तरीही दंगलीत सुंदर कमला नगर शांत होतं. एसआरएची घोषणा झाल्यावर इथल्या लोकांना पहिल्यांदा 160 चौरस फुटाच्या पक्क्या घरांचं स्वप्न पडलं. पण ते तसंच राहिलं. पुढे काहीच घडलं नाही. आता धारावी डेव्हलपमेन्ट प्रोजेक्टची घोषणा झाल्यापासून सुंदर कमला नगरचे रहिवाशी जास्त अस्वस्थ झालेत. त्यांना आपल्या घरांचं स्वप्न शांत बसू देत नाहीय. अजून किती दिवस हा असा एकमेव प्रश्न त्यांना भेडसावत आहे.

DG Loan: महाराष्ट्र पोलिसांवर उसनवारीची वेळ! डीजी लोनमुळे स्वप्नातलं घर रखडलं, काय आहेत व्यथा?

तळटीप: लेखक हे पत्रकार आणि चित्रपट समीक्षक असून त्यांना 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. लेखक हे गोल्डन ग्लोब अवॉर्ड इंटरनॅशनलचे मतदार असून ते फ्रीप्रेस्कीचे सदस्य आहेत. लेखकाने चित्रपट, कला आणि साहित्यावर विपुल लेखन केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com