Ratnagiri Rain Updates: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 11 जूनपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट 

Ratnagiri Rain Updates: रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांत विजांसह वादळी पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

Ratnagiri Rain Updates: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मान्सून चांगलाच सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 46.10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेले 4 दिवस रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. सकाळी ढगाळ वातावरण, पण दुपारनंतर पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र आहे. दरम्यान गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये गेल्या 24 तासांत 50 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महावेधच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक पाऊस हा राजापूर तालुक्यात पडला आहे. राजापूरमध्ये 24 तासांत 76.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल रत्नागिरी तालुक्यात 69.90 मिमी, संगमेश्वरमध्ये 58.20 मिमी, लांजा तालुक्यात 54 मिमी, तर गुहागर तालुक्यात 50.10 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर चिपळूणमध्ये 49.40 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मंडणगड, खेड आणि दापोली या तालुक्यांमध्ये 25 मिमी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. 

(नक्की वाचा:Mumbai Rain Updates: मुंबईत मान्सून दाखल, IMDची अधिकृत घोषणा)

जिल्ह्याला मंगळवारपर्यंत ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्याला 11 जूनपर्यंत म्हणजेच मंगळवारपर्यंत हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्याच्या काही भागांत विजांसह वादळी पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

(नक्की वाचा: पुण्यात मुसळधार पाऊस! नागरिकांची पळापळ, रस्ते बनले तळे)

मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड येथे मोरी खचली

पहिल्याच पावसाचा मुंबई-गोवा महामार्गाला फटका बसला आहे. मुंबई गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील वाकेड इथे मोरी खचली आहे. मोरी खचल्याने वाहने आपटून बंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. त्यामुळे वाकेड गावातले ग्रामस्थ रस्त्यावर उभे राहून वाहन चालकांना रस्ता खचल्याच्या सूचना करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान या प्रकारामुळे मुंबई गोवा महामार्गावरील मोऱ्यांची कामं निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Advertisement

संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे रस्ता खचण्याची भीती

पावसाळा सुरू झालेला आहे, मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी दरडी किंवा रस्ता खचण्याची भीती निर्माण झालेली आहे. संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे. या ठिकाणी संरक्षण भिंतीचं काम सुरू आहे. मात्र हे काम सध्या अर्धवट स्थितीत आहे. हे काम वेळीच पूर्ण झालं नाही तर या ठिकाणी पावसाळ्यात रस्ता खचून वाहतूक ठप्प होण्याची भिती आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने हे काम वेळीच पूर्ण करून खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रवाशांनी देखील प्रवास करताना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

Maharashtra rains update | राज्यात पुढचे तीन ते चार दिवस पावसाचा अलर्ट; कुठे कोणता अलर्ट? पाहा