Maharashtra Lockdown News : महाराष्ट्रात लॉकडाऊन लागण्याच्या चर्चा आणि इंधन टंचाईच्या अफवांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, राज्यात लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही आणि जनतेने अशा दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काही लोक जाणीवपूर्वक समाजात भीती आणि संभ्रम निर्माण करण्यासाठी लॉकडाऊन, पेट्रोल-डिझेलची टंचाई किंवा गॅस सिलिंडर संपत असल्याच्या अफवा पसरवत आहेत. मात्र हे दावे पूर्णपणे चुकीचे आहेत. अशा अफवा पसरवणे हे केवळ बेजबाबदारपणाचे नसून देशद्रोहासारखे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. अफवा पसरवणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
नक्की वाचा - Electricity Bill : 1 एप्रिलपासून विजेचं बिल कमी येणार? EV कार असणाऱ्यांनाही मोठा दिलासा
महानगरपालिकांना गॅस पाइपलाइनच्या कामांना वेग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, जागतिक संकटाच्या काळातही भारताने इंधन पुरवठा सुरळीत ठेवला आहे. वाढत्या किमतींचा भार केंद्र सरकारने स्वतः सोसला असून जनतेवर तो टाकला नाही. राज्यात एलपीजी आणि पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कमर्शियल एलपीजीचा ७० टक्के पुरवठा कायम ठेवण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने सर्व महानगरपालिकांना गॅस पाइपलाइनच्या कामात वेग आणण्याचे निर्देश दिले आहेत. शहरांमध्ये पीएनजी उपलब्ध झाल्यास अशा संकटाच्या काळात कोणतीही अडचण येणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world