Maharashtra Rain Alert Today: मान्सूनने महाराष्ट्रात अधिकृतपणे पाऊल ठेवल्यानंतर आता संपूर्ण राज्याला पावसाने आपल्या कवेत घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले असले तरी, शेतीकामांसाठी हे वातावरण फायदेशीर ठरत आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, २८ जून रोजीही राज्यातील २७ जिल्ह्यांत पावसाचा 'यलो अलर्ट' कायम ठेवण्यात आला आहे.
मुसळधार पावसाचा इशारा
कोकण किनारपट्टीवर मान्सूनची सक्रियता दिसून येत आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीवर ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. येथे ४० ते ५० किमी प्रतितास वेगाचे वारे अपेक्षित आहेत.
मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची हजेरी नोंदवली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. मान्सूनच्या या सक्रियतेमुळे आगामी दिवसांत धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक घाटमाथा, पुणे, अहिल्यानगर, सातारा, रायगड, रत्नागिरी.
नक्की वाचा >>Sangli News: भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारला अपघात, पाच जण जखमी, दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world