राज्याच्या विविध भागांत गेल्या 24 तासांपासून अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीने धुमाकूळ घातला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. नाशिक जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली असून, भिंत कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर अनेक ठिकाणी हजेरी
सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण तालुक्यात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. आपेगावमध्ये अनेक वर्षांची जुनी वडाची झाडे पडली, तर घरांवरील पत्रे उडून गेले. वीज पडून जनावरे दगावली असून वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. काढणीला आलेल्या गहू, हरभरा, मका व आंबा पिकांना याचा फटका बसला. शेतकरी हवालदिल झाले आहेत. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. आपेगावमध्ये अनेक वर्षे जुनी असलेली वडाची झाडे पडली. अनेक घरांवरील पत्रेही उडाले,वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठाही विस्कळीत झाला होता. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या. खांबांचेही नुकसान झाले. तर वीज पडून जनावरे दगावले असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
बुलढाणा आणि धुळ्यात पिकांचे नुकसान
बुलढाण्यातील चिखली, सिंदखेडराजा परिसरात रात्री अकराच्या सुमारास पाऊस झाला. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर आणि कुसुंबा भागात गारपीट झाल्याने गहू, मका, कांदा आणि द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. फळबागासह रब्बीच्या पिकांचे नुकसान होऊन पुन्हा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
(नक्की वाचा- Satara News : महाबळेश्वरपासून अवघे 55 किलोमीटर; यंदाच्या विकेंडला सह्याद्रीच्या कुशीत घ्या अभूतपूर्व अनुभव)
हिंगोली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. रात्री वादळी वारे विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं. शेतात बियाण्याचा कांदा, आंबा, उन्हाळी ज्वारी यासारख्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लग्नकार्यात उडाली तारांबळ
लग्नाची तिथी असल्याने वधू-वर पक्षातील नातेवाईकांची मोठी धांदल उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे लग्न मंडप भिजले आणि पाहुण्यांची पळापळ झाली. हिंगोलीतही रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे उन्हाळी ज्वारी आणि आंब्याचे नुकसान झाले आहे.
नाशिकच्या मालेगावात शाळकरी मुलाचा मृत्यू
मालेगाव तालुक्यातील वनपट गावात वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून यश प्रवीण शिंदे या आठवीत शिकणाऱ्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. गुरांच्या शेडजवळ उभा असताना हा अपघात घडला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
प्रशासनाकडून मदतीची मागणी
"काढणीला आलेला गहू आणि हरभरा आडवा झाला आहे. सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी," अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे. भंडारा जिल्ह्यात मात्र या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असून उन्हाळी धान पिकाला 'नवसंजीवनी' मिळाली आहे.
हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाने (IMD) पुढील काही तास सतर्कतेचा इशारा दिला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी झाडाखाली किंवा वीज वाहिन्यांजवळ उभे राहू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world