Maharashtra Unseasonal Rain: राज्यभर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असतानाच पालघर जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली असून अनेक ठिकाणी दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. पालघरसह जिल्ह्यातील पूर्व भागात सुसाट वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला आहे . दुपारपर्यंत उष्णतेचा तडाखा सहन करणाऱ्या नागरिकांना अचानक आलेल्या या वादळाने अक्षरशः गाफील पकडले. रस्त्यांवर धावपळ, दुकाने बंद करण्याची घाई आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्यासाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळाली.
राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी पिकासह फळबागा आणि वीट भट्टी व्यवसायाला बसला आहे. भट्ट्यांमध्ये तयार ठेवलेली वीट भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आधीच अनिश्चित हवामानामुळे त्रस्त असलेल्या व्यावसायिकांसमोर नव्या संकटाची भर पडली आहे.हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातही मार्च महिन्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हा बदल सक्रिय हवामान प्रणालीमुळे होत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील इतर भागातही या पावसाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. नाशिक, सांगली, जालना आदी भागात गारपिटीसह पावसाने पिकांचे नुकसान केले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. जालना शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात आज गुढीपाडव्याच्या दिवशीच घनसावंगी,बदनापूर मंठा, परतूर तालुक्यात काही गावात गारांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलीय.अचानक बदललेल्या हवामानामुळे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊसाला सुरवात झाली पाऊसा बरोबरच गारांचा पाऊस झाल्याने सोगणीला आलेल्या गहू,हरभरा, मका तसेच फळपिकांचे मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात असून त्यामुळे शेतकरी चिंतेत आणखी भर पडली आहे.
संभाजीनगर, अकोल्यातही बरसल्या सरी
दरम्यान, छत्रपती संभाजी नगर शहर आणि ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह गारांचा देखील पाऊस पाहायला मिळाला. त्यामुळे गहू , ज्वारी या पिकांना मोठा फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट–दर्यापूर रोड परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या भागात काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. सध्या अकोला जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांची गहू काढणी सुरू होण्याच्या टप्प्यावर आली आहे. मात्र अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
( नक्की वाचा : Raj Thackeray:' 'आधी इन्स्टाग्राममधून बाहेर पडा!"; राज ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सभेत असं का सांगितलं?)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world